नवी दिल्लीः तुम्हाला पटले तरच मला मत द्या, नाहीतर नका देऊ, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. गडकरी यांना मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले.
ते म्हणाले, मला समाजकारणात रस आहे. त्यामुळे लोकांना मी सांगितलं आहे की, पटले तरच मत द्या, नाहीतर नका देऊ. मतांसाठी मी आता फार लोणी लावणार नाही. मला समाजकारणाला अधिक वेळ द्यायचा आहे. कराण मी पुष्कळ वेळा निवडून आलो आहे.
वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते गडकरींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी गडकरी यांनी पर्यावरणावरही भाष्य केले. वेस्ट लॅंडवर बांबू लागवड केली तर ५ लाख कोटींची अर्थव्यवस्था उभी राहू शकते. पर्यावरण रक्षणासोबतच रोजगारनिर्मितीही होऊ शकते. मुळात मुख्य प्रवाहातील लोकांना पर्यावरण व जलसंवर्धनाचे महत्त्व समजत नाही. त्यांनी या विषयाला अधिक प्राध्यान्य द्यायला हवे.
दरम्यान, नुकतीच गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. गेल्या आठवड्यात गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन त्यांच्याच कार्यालयात आला होता. यांच्या जनसंपर्क कार्यालयात २१ मार्चला सकाळच्या सुमारास दोन वेळा धमकीचा फोन आला. यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली. नागपुरात ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोर नितीन गडकरींचं हे जनसंपर्क कार्यालय आहे. तेथे हा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती.
नितीन गडकरींना धमकीचे फोन येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १४ जानेवारी रोजी गडकरींना अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी देणारा फोन केला होता. धक्कादायक म्हणजे मागच्या वेळी ज्या गुंडाच्या नावाने धमकी देण्यात आली होती, त्याच गुंडाच्या नावाने पुन्हा दोन वेळा कॉल आले. जयेश पुजारी असं या गुंडाचं नाव आहे. या कुख्यात गुंडावर हत्या, अपहरण आणि खंडणी वसूलीचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी तो कर्नाटकातील कारागृहातून फरार झाला होता. या गुंडाला जयेश कांता नावाने देखील ओळखलं जातं. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.