आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जे.पी. नड्डा यांचा चंद्रपूर आणि औरंगाबाद दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र असे असतानाही पुन्हा एकदा भाजपाने पंकजा मुंडे यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात होते. अशातच आता या चर्चांना पंकजा मुंडेंनी पूर्णविराम दिला आहे. (pankaja munde reacts on rumors of unhappy one minute speech in front of bjp president jp nadda)
पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेत ३० सेकंद भाषण केले. या भाषणानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “माझं नाव निमंत्रण पत्रिकेत असण्याचं कारण नाही, कारण हा लोकसभा मतदारसंघ माझा नाही, म्हणून मी नाराज आहे म्हणणं चुकीचं आहे. मला कमी वेळ दिला असं म्हणणंही चुकीचं आहे, कारण वेळ कमी होता आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचं भाषण महत्त्वाचं होतं. गोपीनाथ मुंडे होते त्यावेळीही आणि त्यांच्यानंतरही माझा संघर्ष सुरूच आहे. संघर्षातून शिकायला मिळते. सध्या राज्याच्या राजकारणात जे सुरू आहे, त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम तयार होतो. लोकांमध्ये दुफळी निर्माण होते. महापुरुषांबद्दल बोलणं टाळलं पाहिजे. सर्वच महापुरुषांच्या नशिबी संघर्ष होता”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
जेपी नड्डा यांच्या औरंगाबादमधल्या सभेला उशीर झाला होता. त्यामुळे पंकजा मुंडे यांना 2 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. राष्ट्रीय अध्यक्षांना जास्त वेळ मिळावा म्हणून पंकजा मुंडे यांनी अत्यंत कमी भाषण केले. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘पक्षाचे आदेश मानणे हे माझ्यावरचे संस्कार आहेत’.
जे पी नड्डा यांनी चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली. जे पी नड्डा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातल्या कार्यक्रम पत्रिकेवर पंकजा मुंडे यांचे नाव नव्हते.
हेही वाचा – भाजप पूर्ण ताकदीने लोकसभा आणि विधानसभा लढवणार, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया