राज्यसभा निवडणुकीमध्ये सहाव्या जागेसाठी भाजप-शिवसेनेमध्ये चुरस होती. परंतु भाजपचे तिसरा आणि राज्यसभेचा सहावा उमेदवार असलेले धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आखलेल्या रणनितीमुळे भाजपचा विजय झाला आहे. भाजपच्या विजयानंतर महाविकास आघाडीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घणाघात केला आहे. भाजपने तिसरी जागा जिंकून बड्या बड्या वाघांची मान झुकवली अशी टीका आठवलेंनी महाविकास आघाडीवर केली आहे.
केंद्रीय मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर आठवलेंनी टीकास्त्र डागलं, यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे कौतुक रामदास आठवलेंनी केलं आहे. रामदास आठवले म्हणाले की, ‘राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आपली जागा दाखविली आहे. निवडणूक कशी जिंकायची ती शिकवली आहे. तिसरी जागा जिंकून बड्या बड्या वाघांची मान झुकविली आहे”. अशी टीका आठवलेंनी ट्विट करत महाविकास आघाडीवर केली आहे.
राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आपली जागा दाखविली आहे.;
निवडणूक कशी जिंकायची ती शिकविली आहे.
तिसरी जागा जिंकून बड्या बड्या वाघांची मान झुकविली आहे.@Dev_Fadnavis— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 11, 2022
धनंजय महाडिकांचा विजय
भाजपचे राज्यसभेच्या सहाव्या जागेवरील उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. त्यांनी कोल्हापूरचे शिवसेना उमेदवार संजय पवार यांना पराभूत केलं आहे. धनंजय महाडिक यांनी मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत धोबीपछाड केला आहे. परंतु या विजयाचे श्रेय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जात आहे. फडणवीसांनी रणनिती आखून अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवलं आहे. धनंजय महाडिकांचा विजय महाविकास आघाडीसाठी धक्कादायक असल्याचे मानले जात आहे.
शरद पवारांकडून फडणवीसांचे कौतुक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केलं आहे. भाजपाला आम्हाला पाठिंबा देणारे जे इच्छुक होते त्यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी भाजपाने जी कारवाई केली त्यामध्ये त्यांना यश आले. त्यामुळे हा फरक पडला आहे. आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झालं आहे. यामध्ये वेगळे काही नाही. जो चमत्कार झाला तो मान्य केला पाहिजे की, देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्यात यश आले आहे. असे म्हणत शरद पवारांनी फडणवीसांचे कौतुक केलं आहे.