अशा शक्तीप्रदर्शनाने, पैशाची ताकद दाखवून देवी पावते का? ती कोकणातील भराडी देवी आहे, आयुष्यभर त्या देवीने शिवसेनेलाच आशीर्वाद दिले आहेत. शिवसेनेचा जन्म हा कोकणातून झाला आहे. कोकणात शिवसेनेची खरी ताकद आहे, भराडी देवीचा जर पाठिंबा असता तर तो कालच्या विधानपरिषद निवडणुकीत दिसला असता, असा टोला आज शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी शिंदे – फडणवीस सरकारला लगावला आहे. सिंधुदुर्गातील मालवणमधील आंगणेवाडीच्या आई भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवीच्या दर्शनासाठी जाणार आहे. यावरून राऊतांनी शिंदे – फडणवीसांना टोला लगावला आहे.
देवी ही देवी आहे सर्वांच कल्याण करते, पण ती कोकणच्या भूमीवरील देवी आहे. भराडी देवीचं महत्व आणि मांगल्य काय आहे हे आम्हाला जास्त माहित आहे. असे पैशाचे खेळ करुन देवस्थान आणि श्रद्धास्थान ताब्यात घेता येत नाही, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले.
संजय राऊतांचे अजित पवारांना प्रत्युत्तर म्हणाले… विश्वासूचं
शिवसेनेतील बंडखोरीवरून राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले. यावरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अजित पवार यांनी त्यांच म्हणणं आमच्याकडेही वारंवार व्यक्त केलं आहे. उद्धव ठाकरे गाफील राहिले म्हणण्यापेक्षा त्यांनी आपल्या लोकांवर जास्त विश्वास ठेवला. त्यांनी विश्वासू लोकांवरच जास्त विश्वास ठेवला. विश्वासघात विश्वासू लोकांकडूनचं होत असतो. हे अजित दादा पवारांनाही माहित आहे. त्यांना ते सांगायला नको, अशा शब्दात संजय राऊतांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही देखील या हालचाली उद्धव ठाकरेंना सांगत होतो, असं नाही की, अजित पवारच सांगत होते किंवा अन्य लोकं सांगत होते. या हालचालींचा सुगावा सगळ्यांना लागला होता, तरी आपली लोकं आहेत विश्वासाची लोकं आहेत ,स्वत:ला कडवट निष्ठावान म्हणवतात त्यांच्यावर अशाप्रकारे अविश्वास दाखवणं बरोबर नाही, आपण त्यांच्याशी बोलू, असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं होत, असही राऊतांनी स्पष्ट केलं आहे.