राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. आज देशातील आणि राज्यातील नागरिकांसमोर अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी समाजकारण म्हणून प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. नागरिकांना पडलेले प्रश्न जाणून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचे काम करणारा कार्यकर्ता हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. लोकांच्या मनातील अन्याय, अस्वस्थता जाणवल्यानंतर रात्री त्याला झोप आली नाही आणि अस्वस्थ झाला असल्यास तो खरा कार्यकर्ता असून त्याची बांधिलकी त्या ठिकाणी असल्याचे शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार त्यांच्या वाढदिवसानिमित्त बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “आज खऱ्या अर्थाने काही गोष्टींचा संदर्भांचा विचार आपण सगळ्यांना घ्यायचा आहे. आपण एका विचाराने महाराष्ट्रात आणि देशात काम करत असतो पक्ष लहान असेल, मर्यादित कार्यकर्ते असतील पण बांधिलकी असलेले कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचे वैशिष्ट्ये आहे. म्हणून आज जे असंख्य प्रश्न देशासमोर आहेत. सामान्य लोकांच्या समोर आहे. त्यांचे उत्तर शोधण्यासाठी आणि त्यांची सुटका करण्यासाठी काम करणारा पक्षातील कार्यकर्ता कोणता तर लोकांनी हा निष्कर्ष काढला पाहिजे की, हा राष्ट्रवादी काँग्रेसचं असू शकतो त्या पद्धतीने पक्षाची बांधणी करायची आहे. लहान घटकांना सोबत घ्यायचे आहे” असे शरद पवार म्हणाले आहेत.
लोकांना भेटताना मानसिक समाधान मिळते
“मी महाराष्ट्रात फिरत असतो. मला लोकांना भेटताना एक प्रकारचा मानसिक समाधान मिळतो. त्यांच्या समस्या ऐकायला मिळतात. अनेक ठिकाणी जतो मराठवाड्यात गेलो, मला आठवत आहे अनेकदा संध्याकाळी औरंगाबादला लहान समाजाच्या पुढे आलेल्या तरुणांच्या सोबत संध्याकाळ घालवली आहे. अनेकांचे ऐकायला मिळतं, अलीकडच्या काळात नव्या पिढीत विचार करणारे, लिहिणारे मोठ्या प्रमाणात लोकं तयार झाले आहेत. सहजपणामुळे काही बोलून जातात”.
त्यावेळेस एक लहान गोष्ट सांगितली होती
“त्यावेळेस एक लहान गोष्ट सांगितली होती. एक दिवशी मी औरंगाबदाल होतो. अनेक महाविद्यालये आहेत. मराठवाडा शिक्षण मंडळ, सरस्वती शिक्षण संस्था आहेत. तिथले वैशिष्ट्य आहे विदर्भातील दलित तरुण आणि तरुणी औऱंगाबादला शिकायला येत असतात. कारण तिथे पहिले महाविद्याल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढले आहे. त्यांनी काढले म्हणून लहान समाजाच्या मुला मुलींमध्ये अधिक आकर्षण आहे. म्हणून त्या विद्यार्थ्यांसोबत अनेकवेळा संध्याकळ घालवली आहे. त्यांच्या मनातील अस्वस्थता, अन्याय अत्याचारबाबत काय विचार आहेत. त्यांचे ऐकायला मिळते, समाजकारण म्हणून त्यांच्या यातना दूर करण्यासाठी राजकीय पक्ष म्हणून काय करता येईल यावर विचार करायला मिळतो” असे शरद पवार म्हणाले.
तुमची समाजरचना आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे
कवीचे नाव मोतीराज राठोड हा बंजारा समाजाचा होता. झोपडीत राहणारा होता. त्याला सहज विचारला काय विचार करतोय त्यावर तो म्हणाला मी तुमच्या सर्वांच्या विरुद्ध विचार करतो आहे. म्हणजे काय विचारले असता त्यांनी सांगितले माझी एक लहान कविता आहे. त्या कवितेचे नाव पाथरवट असे आहे. कवितेत सांगितले की, मोठा दगड घेतला. त्या दगडावर आमच्या घामानं, कष्टाने हातोडा आणि छन्नीने दगडाचे मुर्तीत रुपांतर केलं. त्यानंतर सगळं गाव आले त्यापुर्वी माझ्याकडे कोणी बघत नव्हते पण सगळं गाव आले आणि गावाने वाजत गाजत मुर्ती मंदिरात स्थापन केली.
हे ऐकल्यावर अस्वस्थ झाला तर तो खरा कार्यकर्ता
गंमत काय तर माझ्या घामाने मुर्ती तयार केली. पंरतु मी दलित असल्यामुळे मंदिरात मला प्रवेश नाही. ही मुर्ती तुमच्या बापजाद्याचे प्रतिक आहे. पण तीचा बापजादा मी आहे. परंतु मी त्या मंदिरात जाऊ शकत नाही ती तुमची समाजरचना आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे. अशी एखादी कविता ऐकल्यावर रात्री झोप येऊ शकत नाही. आपण काही केलं असेल नसेल परंतु आपण त्या समाजाचे प्रतिनिधी आहोत. आणि त्या समाजाच्या प्रतिनिधीने या समाजावार अन्याय अत्याचार केलेत त्याची अस्वस्थता त्यांच्या मनात आहे ती दूर करण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हे ऐकल्यावर अस्वस्थ झाला तर तो खरा कार्यकर्ता त्याची बांधिलकी त्या ठिकाणी केली आहे. ठिकठिकाणी या गोष्टी ऐकायला मिळत असतात असे शरद पवार म्हणाले.
हेही वाचा : …तर २०२४ मध्ये देशात शरद पवारांच्या नेतृत्वात पर्यायी सरकार निर्माण होऊ शकते – नवाब मलिक