पतंजलीचे प्रमुख योगगुरु बाबा रामदेव नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात, अशात पुन्हा एकदा त्यांनी महिलांविषयी वादग्रस्त विधान केले आहे. पंतजलीच्या मोफत शिबीरात बोलताना बाबा रामदेव यांनी महिला साडीत छान दिसतात, सलवार सुटमध्येही छान दिसतात, आणि माझ्या नजरेने पाहिले तर, काही कपडे घातले नाही तरी छानचं दिसतात, असं विधान केले. त्यांच्या या विधानावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच चिघळले आहे. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक सवाल केला आहे. तसेच भाजप नेत्यांच्या सततच्या वादग्रस्त विधानांवरून शिंदे फडणवीस सरकारने आपली जीभ दिल्लीला गहाण ठेवली का असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे. राऊत आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
राऊत म्हणाले की, बाबा रामदेव यांनी लज्जास्पद विधान केलं असताना तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. अशाप्रकारचं लज्जास्पद विधान केलं असताना अमृता वहिणी गप्प कशा बसल्या? असं विधान करणारा कोणीही असो कितीही मोठा असो त्याच्या सनसनीत कानाखाली बसायला पाहिजे होती. असं राऊत म्हणाले.
एका बाजूला महिलांच्या रक्षणाच्या, सबलीकरणाच्या गोष्टी करता, कायदे बनवता, ज्ञान पाजळता, त्याचवेळी असंख्य महिलांसमोर एक बाबा एक महाराज भगव्या वस्त्रात महिलांचा असा अपमान करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून राज्यपालांच्या बाततीत सरकार गप्प बसलं, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातून सांगली, सोलापूर खेचून घेण्याची भाषा केली तरी सरकार गप्प आणि आता बाबा रामदेव सारखे भाजपचे महाप्रचारक हे महिलांविषयी अभद्र बोलतात तरी सरकार गप्प बसलं आहे. या सरकारची जीभ कुठे दिल्लीला गहाण ठेवली आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.