राज्यात गेल्या १ महिन्याहून अधिक काळ एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यात अनेक कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई करत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर अद्यापही कामावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले होते. याचपार्श्वभूमीवर आज परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांवर २० तारखेपर्यंत मेस्माअंतर्गत कारवाई केली जाणार नाही असे संकेत अनिल परब यांनी दिले आहेत.
यावर बोलताना अनिल परब म्हणाले की, “एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. उच्च न्यायलयाने एसटी महामंडळाच्या विलिनीकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी १२ आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने यासंदर्भातील प्राथमिक अहवाल राज्य सरकारकडे मागितला आहे. २० डिसेंबराला न्यायालयात प्राथमिक अहवाल सादर होईल त्यानंतर मेस्मा संदर्भात निर्णय घेतला जाईल.”
”मेस्मासंदर्भात आत्ता चर्चा सुरु आहे, याबाबतीत सर्व गोष्टींचा विचार करुन निर्णय घेतला जाईल. कारवाई कोणती करायची काय करायची हा प्रशासनाचा अधिकार आहे, तो सर्वांशी चर्चा करुन ठरवला जाईल. बऱ्याच कामगारांना समज करुन दिला आहे की, २० तारखेला कोर्टात विलिनीकरणाची ऑर्डर होणार आहे, कामगारांना भरकटवले जातेय. कोणाच ऐकायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. असंही अनिल परब म्हणाले.