आरोग्यासाठी निधी कमी पडू नये, यासाठी अधिवेशनात 300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल. तसेच, राज्यातील अधिकाधिक नागरिकांच्या लसीकरणासाठी हाफकीनला लस निर्मितीसाठी मंजूरी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
नाशिक दौर्यावर आलेल्या अजित पवारांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी शेतकर्यांच्या प्रश्नावर भूमिका मांडली. ते म्हणाले की, एकिकडे कृषी दिन साजरा होत असताना दिल्लीत ७ महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पवार साहेब ५० वर्षांपासून जनतेत आहेत. शेतकर्यांच्या हितासाठीचे विधेयकही आम्ही विधिमंडळात आणणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री पवारांनी केले. शेतमालाला रास्त भाव मिळावा आणि त्यांची फसवणूक होणार नाही यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न सुरू आहेत. शेतकर्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.