मुंबईतील काँग्रेस पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी नियुक्तीची घोषणा केली आहे.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड
काँग्रेसने मुंबईसोबतच गुजरात आणि पाँडेचेरीमध्येही नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. वर्षा गायकवाड या मुंबईतील धारावी मतदारसंघातून सलग ४ वेळा विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. तसेच त्यांनी २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्याआधी त्यांनी मविआ सरकारच्या काळात महिला आणि बालविकास मंत्री म्हणून काम पाहिले होते. वर्षा गायकवाड या काँग्रेसचे दिवंगत नेते एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत.
Congress President Shri @Kharge has appointed Shri @shaktisinhgohil, Shri V. Vaithilingam and Smt. @VarshaEGaikwad as Presidents of the Gujarat PCC, Puducherry PCC, and Mumbai RCC, respectively, with immediate effect. pic.twitter.com/w6XkC0ARXU
— Congress (@INCIndia) June 9, 2023
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. परंतु आगामी काळात पालिकेसह लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सध्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. अशातच काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली असून भाई जगताप यांच्या जागी वर्षा गायकवाड यांच्या रुपाने पक्षातील महिला चेहऱ्याला संधी दिली आहे.
आक्रमक चेहरा म्हणून भाई जगताप…
भाई जगताप यांच्या राजकीय कारकीर्दीला विद्यार्थी चळवळीपासून सुरुवात झाली. एप्रिल २०२१ मध्ये मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड करण्यात आली होती. एक आक्रमक चेहरा म्हणून भाई जगताप यांच्याकडं पाहिलं जातं. परंतु निवडणुकीपूर्वीच त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं असून काँग्रेसची पुढील रणनिती काय असेल? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा : Mira road murder case : आरोपी मनोज आणि सरस्वतीचं नातं काय? पीडितेच्या बहिणींचा खुलासा