उत्तर प्रदेशमधील सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. यूपीतील योगी सरकारवर राजकीय पक्षांनी योगी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, आता हाथरस प्रकरणावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर गंभीर टीका केली आहे. महिला म्हणजे उपभोग्य वस्तू असा संघ आणि भाजपाचा दृष्टीकोन असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आंबेडकर पुण्यात होते.
“हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला गेला ही चांगली गोष्टं असं मी मानतो. तरूण पिढी आता महिलांवरील अत्याचारांकडे एका वेगळ्या नजरेतून पाहताना दिसत आहे. आरएसएस-भाजप महिला उपोभगण्याची वस्तू आहे, असा प्रचार आणि प्रसार करतात. ती महिला आहे, तिला जगण्याचा अधिकार आहे आणि तिचे अधिकार शाबूत राहिले पाहिजेत. तिला जसं जगायचं आहे, तसं तिला जगता आलं पाहिजे. तिच्यावर कुणी अत्याचार करू नये, अशी मानसिकता नव्या पिढीकडे आहे. ही नवी पिढी मला देशभरात रस्त्यावर उतरलेली दिसली,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाने अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांवर देखील भाष्य केलं.
पोलीस किंवा एसआयटी त्यांना सूचना असल्याशिवाय स्वत: हून कधीही धमकावू शकत नाही. त्यांना या सूचना राजकीय नेतृत्वच देणार. म्हणूनच त्या कुटुंबाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्यावतीने एका न्यायाधीशाची नेमणूक केली जावी आणि त्यांच्याच नियंत्रणाखाली ही चौकशी झाली तर आम्हाला न्याय मिळेल. या मागणीला आमचा पाठिंबा आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.