राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत भाजपला चांगले यश मिळालं आहे. भाजपला मिळालेल्या यशाबद्दल भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. तसेच भाजपचा ट्रेंड कायम असून आताही भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. भाजपला राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या असल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. राज्यात ६ जिल्हा परिषदा आणि ३८ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांवर पोटनिवडणूक घेण्यात आली होती. भाजपला एकूण २२ जागांवर विजय मिळवण्यात यश मिळालं आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांनी सत्तेचा पुरेपूर वापर केला तरीही मतदारांनी भाजपाला पहिली पसंती दिली आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यात सत्तेवर असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता व भाजपा विरोधी पक्ष असला तरीही तोच ट्रेंड आज कायम राहिला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने युती करून पूर्ण बहुमताने विजय मिळविला. त्यानंतर विरोधी पक्षात बसावे लागले तरीही भाजपाला जनतेचा पाठिंबा टिकून आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिडवणुकीत भाजपाला विजय मिळाला. राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. आगामी देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकतही भाजपा विजयी होईल याचा आपल्याला विश्वास आहे.
भाजपने बांधिलकी पाळली
सर्वोच्च न्यायालयात ओबीसी राजकीय आरक्षणाची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याने न्यायालयाने या ओबीसी आरक्षित जागांवरील निवडणूक रद्द केली होती आणि मतदारांवर पोटनिवडणुकीची वेळ आली. या जागा खुल्या झाल्या तरीही ओबीसी उमेदवार देऊन भाजपाने आपली बांधिलकी पाळली. मतदारांनी भाजपाला सर्वाधिक जागांवर विजयी करून पक्षाला पाठिंबा दिल्याचे निकालावरून दिसत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : जनतेनं भाजपच्या विचारांना नाकारलं, पोटनिवडणुकांच्या निकालावर जयंत पाटलांचे मोठं विधान