मालाडमध्ये पुन्हा एकदा संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. मालाडमधील बोर्गेस हाऊसची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिका दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. याआधी देखील मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री मालाडमध्ये संरक्षण भिंत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या दुर्घटनेत २१ जणांचा हकनाक बळी गेला होता. त्याचबरोबर पुण्याच्या कोंडवा परिसरातही इमारतीची संरक्षण भिंत कोसळून १५ जणांचा बळी गेला होता. तर सोमवारी मध्यरात्री कल्याणच्या नॅशनल उर्दू शाळेची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेतही ३ जणांचा मृत्यू झाला होता.
मालाडच्या आंबेडकरनगर आणि पिंपरीपाडात कोसळली भिंत
रात्रीच्या सुमारास अचानक भिंत झोपड्यांवर कोसळल्याने या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना नेमकं काय करावं? कुठे पळावं? हे सूचतंच नव्हतं. त्यातून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेत लहान मुलांचाही हकनाक मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू केलं गेलं. एनडीआरएफचे जवान, अग्निशमन दलाचे जवान, पोलीस प्रशासन आणि स्थानिक रहिवासी लोकांचं शोधकार्य करत होते. मंगळवारी दिवसभर अशीच परिस्थिती होती. बुधवारी जवानांकडून शोधकार्य थांबवलं गेलं. पण, स्थानिक लोक आपलं कोणी जमिनीखाली अडकलं आहे यासाठी स्वत: च शोधकार्य करत होते. त्यामुळे स्थानिकांमध्येही नाराजी होती.
या घटनेत अनेकांनी आपले नातेवाईक गमावले. तर, आंबेडकर नगर परिसरातील अनेक झोपड्यांचं नुकसान झालं. स्थानिक जमिनीखाली आपला संसार शोधत होते. ही परिस्थिती आजही कायम आहे. कारण, या परिसरातील दोनशेहून अधिक झोपड्या पाण्याखाली वाहून गेल्या आहेत. पुन्हा संसार कसा उभारावा आणि कुठून सुरुवात करायची असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडला आहे. त्यामुळे, सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करतात. सद्यपरिस्थितीत जखमींवर मुंबईतील शताब्दी हॉस्पिटल, कूपर हॉस्पिटल, केईएम, व्ही.एस.देसाई या हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत. त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
हेही वाचा – मालाड भिंत घटना – दहावीतल्या सुमीतला हाता-पायाला फ्रॅक्चर
हेही वाचा – मालाड दुर्घटना : मुख्यमंत्र्यांची मदत पोहोचणार कधी? स्थानिक हवालदील!