मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी तसेच ‘मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये’, असे आवाहन करत, काकासाहेब पाटील यांनी औरंगाबाद ते मुंबई काढलेली पदयात्रा आज पूर्ण झाली. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री राज्य अतिथीगृहात भेट घेऊन, पाटील यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सादर केले. दरम्यान ‘मराठा समाजाच्या सर्वच मागण्यांवर शासन सकारात्मक असून विविध निर्णयांची अंमलबजावणी होत आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पाटील यांनी त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी १ सप्टेंबरपासून औरंगाबाद येथील क्रांती चौकातून पायी प्रवास सुरु केला होता. आज भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
वाचा : मराठा आरक्षणासंबंधीचा अंतिम अहवाल १५ नोव्हेंबरला
दरम्यान ‘मराठा तरुणांनी आत्महत्या न करण्याबाबत मी त्यांना आवाहन केले असल्याचे’ पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. ”मराठा समाजाच्या मागण्या निश्चित पूर्ण होऊ शकतील. त्यामुळे मराठा तरुणांनी नैराश्य न बाळगता वाटचाल करावी. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. त्यामुळे कुटुंबाचे मोठे नुकसान होते. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलाल तर आरक्षण लागू होईल तेव्हा त्याचा उपयोग कोणाला होणार”, असे भावनिक उद्गार पाटील यांनी यावेळी काढले.