घरमुंबईपंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास; बावनकुळेंचा बाजू सांभाळून घेण्याचा प्रयत्न

पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास; बावनकुळेंचा बाजू सांभाळून घेण्याचा प्रयत्न

Subscribe

मुंबई : ‘मी भारतीय जनता पक्षाची आहे. पण पक्ष माझा थोडीच आहे’, असे वक्तव्य भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात केले आणि चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले. परंतु भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजू सांभाळून घेण्याचा प्रयत्न करताना दिसले. त्यांनी म्हटले की, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. बावनकुळे यांनी एका वृत्तवाहिणीशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. (Bawankules tried to take sides, Pankaja Munde’s statement)

चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे यांची बाजू सांभाळून घेताना वक्तव्य केले की, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा संपूर्ण विपर्यास करण्यात आलेला आहे. त्यांनी भाजपाबद्दल बोलताना पक्ष माझ्या पाठीशी आहे, असे वक्तव्य केले होते. मी त्यांचे संपूर्ण भाषण ऐकलेले आहे. त्या भाजपच्या नेत्या असल्यामुळेच त्यांच्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो. पंकजा मुंडे महाराष्ट्रात फिरताना पक्षाच्या जनसंपर्क अभियानात सहभागी झाल्या आहेत. याशिवाय मध्यप्रदेशात त्यांच्या अनेक सभा होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही विषयाला धरुन त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणे चूकीची असल्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले.

- Advertisement -

आम्ही विरोधी नेत्यांना महासागरासारखं सामावून घेऊ
बावनकुळे भाजपमधील इनकमिंगविषयी बोलताना म्हणाले की, आमचा पक्ष महासागर, अरबी समुद्रासारखा आहे. या महासागरामध्ये कितीही लहान, मोठा किंवा कोणत्याही पक्षातला नेता आला तरी आमच्याकडे खूप जागा आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी आमच्याकडे वेगवेगळे सेल आहेत, पस्तीस प्रकोष्ठ आहेत, याशिवाय किसान आघाडी, महिला आघाडीसारख्या नऊ आघाड्या आहेत. आम्हाला 48 लोकसभेच्या आणि विधानसभेच्या 288 जागा युती म्हणून लढायच्या असल्यामुळे कोणीही पक्षात आले तरी आम्ही त्याला क्षमतेप्रमाणे काम देऊ शकतो. त्यामुळे इतर पक्षातील नेते भाजपामध्ये आल्यास त्यांना आम्ही महासागरासारखं सामावून घेऊ.

भाजपामुळे ओबीसींच्या आरक्षणाचा तिढा सुटला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी मेळाव्यावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत आल्यावर ओबीसींसाठी काहीही केले नसल्यामुळे त्यांना आज ओबीसी मेळावे घ्यावे लागत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे राष्ट्रीय ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा मिळाला, फडणवीस यांच्यामुळे राज्यात ओबीसी मंत्रालय आणि महाज्योती निर्माण झाल्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाचा तिढा सुटला. अजित पवारांनी त्या संदर्भातील निधीची फाईल फेकून दिली होती. शिंदे-फडणवीस सरकारमुळे ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आरक्षण मिळाले असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
‘घर चलो अभियाना’तून राज्यातील 3 कोटी कुटुंबांशी साधणार संपर्क
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या अभियानाबाबत माहिती देताना सांगितले की, ‘घर चलो अभियाना’च्या माध्यमातून आम्ही 30 मे पासून 30 जूनपर्यंत जनसंपर्क अभियान चालवत आहोत. या अभियानासाठी केंद्राचे अनेक नेते महाराष्ट्रात येणार असून प्रत्येक मतदारसंघात संपर्क साधणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील 3 कोटी कुटुंबांशी संपर्क करणार आहोत, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
राष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर यांच्या जयंती निमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, लोक मला म्हणतात ताईचा पक्ष ताईचा पक्ष, पण माझीा कुठला पक्ष? मी भारतीय जनता पक्षाची आहे. पण पक्ष माझा थोडीच आहे. भाजपा खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपाची होऊ शकते. पण पक्ष माझा होऊ शकत नाही. मला कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईन. आम्हाला काही गमवायचंच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा राहिलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -