शहरात अनेक ठिकाणी गुटखा व तंबाखू विक्री होत असल्यासंदर्भातील आलेल्या तक्रारींची दखल घेत राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) २४ आणि २५ मे असे दोन दिवस केलेल्या कारवाईत तब्बल ८१ दुकाने सीलबंद करुन ८९ जणांवर कारवाई करण्यात आली.
तसेच या कारवाईत १५ लाख किमतीचा साठाही जप्त करण्यात आला. गुटखा, पानमसाला,सुगंधित तंबाखू, सुपारी यासारखे आरोग्यास हानिकारक असलेल्या उत्पादनांची उत्पादन व विक्री करण्यास महाराष्ट्रात बंदी असतानाही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री व उत्पादन होत असल्याच्या तक्रारी एफडीएकडे आल्या होत्या. याची दखल घेत अन्न सुरक्षा आयुक्त पल्लवी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त शेलेंद्र आढाव यांनी १८ पथके तयार करुन नळबाजार, डोंगरी, धारावी, साकीनाका, चेंबूर, कुर्ला येथे कारवाई केली.