ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘ग्रीन फटाके’ वाजवण्याचा सल्ला दिला आहे. तर, मुंबई उच्च न्यायालयाने निवासी परिसरात वाजवण्यात येणार्या फटाक्यांचा आवाज ५५ डेसिबलपेक्षा जास्त असता कामा नये असा आदेश दिला आहे. मात्र, या दोन्ही निर्देशांचे फटाके निर्मित करणार्या कंपन्यांकडून उघडपणे उल्लंघन होत आहे. ध्वनी आणि रासायनिक घटकांसंदर्भातील कोणत्याही सूचना फटाके बनवणार्य‘ा कंपन्यांकडून फटाक्यांच्या बॉक्सवर दिल्या जात नाहीत. त्यामुळे, दिवाळीत फटाके फोडणार्यांमध्ये ‘ग्रीन फटाक्यां’ बाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो.
‘फटाक्यांवर दोन्ही मर्यादा म्हणजे फटाक्यांमध्ये वापरलेले रासायनिक घटक आणि फटाक्यांच्या आवाजाच्या मर्यादेची माहिती छापण्यात येत नाही. शिवाय, जे परवानाधारक विक्रेते आहेत ते ही ग्रीन फटाके त्यांच्या स्टॉल्सवर विकत नाहीत. त्यामुळे आजही फटाके किती मर्यादेपर्यंत फोडावेत ? याची माहिती कोणालाही नसते ,अशी माहिती ‘आवाज फाऊंडेशन’ सर्व्हेद्वारे समोर आली आहे.
आवाज फाऊंडेशन आणि एमपीसीबी म्हणजेच महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डने मिळून मुंबईतील वेगवेगळ्या विभागातील फटाके विक्रेत्यांकडून ४२ फटाक्यांच्या नमुन्यांची २४ ऑक्टोबर या दिवशी तपासणी केली. यात सुतळी बॉम्बपासून आकाशात उडणार्या फटाक्यांचा समावेश होता. यातील अधिकतर फटाक्यांच्या पाकिटांवर ध्वनी मर्यादा आणि रासायनिक घटक यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नव्हती. पण, गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत गेल्या दोन – तीन वर्षांमध्ये ध्वनी प्रदूषण होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
उच्च न्यायालयाचा आदेश –
निवासी परिसरात कुठल्याही प्रकारचा ५५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज असता कामा नये. तर, जागतिक आरोग्य संघटनेनुसार, मानवी शरीर हे कुठल्याही अवस्थेत किमान ७० डेसिबल एवढा आवाज सहन करू शकते. पण, सर्व फटाके या पातळीचे उल्लंघन करतात.
आवाज फाऊंडेशनचा अहवाल –
आवाज फाऊंडेशनकडून ४२ फटाक्यांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात अधिकतर फटाक्यांच्या पाकिटांवर ध्वनी मर्यादा आणि रासायनिक घटकांबाबत माहिती उपलब्ध केली नव्हती. शिवाय, परवानाधारक फटाके विक्रेतेही ग्रीन फटाके म्हणजेच प्रदूषण न होणारे फटाके त्यांच्या स्टॉल्सवर विक्रीसाठी ठेवत नाही. तसेच, ज्या फटाक्यांच्या पाकिटावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे, ती सुद्धा अर्धवट असल्याचे आवाज फाऊंडेशनच्या संयोजक सुमायरा अब्दुलली यांनी सांगितले. त्यासोबतच मुंबईकरांनी फटाके वाजवत असताना फटाक्यांच्या पाकिटांवर सर्व माहिती दिली आहे का ? हे तपासूनच फटाके वाजवावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.