भाजप नेते किरीट सोमय्या यांची अडवणूक केल्याप्रकरणी सोमय्यांनी पोलिसांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच येत्या २४ तासांच्या आता मुलुंडसह मुंबई पोलिसांनी माफी मागावी, अशी देखील त्यांनी मागणी केली. नवघर मुलुंड पूर्व येथील पोलीस ठाण्यात सोमय्यांनी ही पोलिसांविरोधातील तक्रार दाखल केली आहे. तसेच, कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि कोल्हापूर एसपी यांना सोमय्यांनी पुन्हा पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले की, २० सप्टेंबर रोजी स्थगित झालेला कार्यक्रम मंगळवारी आणि बुधवारी, मंगळवारी सकाळी ९ वाजता आई आंबाबाईचं दर्शन घेऊन हा कार्यक्रम करणार आहे.
आज 22 सप्टेंबर दुपारी 12 वाजता, मी नवघर मुलुंड पूर्व पोलीस स्टेशन आणि दुपारी 1.30 वाजता एमआरए मार्ग पोलीस स्टेशनमध्ये (सीएसटीएम जवळ), 20 सप्टेंबर रोजी पोलीसांनी मला माझ्या निवासस्थानी आणि सीएसटीएम रेल्वे स्थानकावर बेकायदेशीरपणे आडवून ठेवल्याबद्दल तक्रार दाखल करणार आहे
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 22, 2021
उद्धव ठाकरे आणि शरद पवार मला इतके का घाबरतात? उद्या उद्धव ठाकरेंचे १९ बंगले पाहण्यासाठी गेल्यानंतर हे काय करणार?’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे. यावेळी किरीट सोमय्या म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी असताना मला घरात कोंडून ठेवण्यात आलं. कायदेशीर नोटीस दिल्यानंतर जाऊ दिलं. त्यानंतर सीएसटीबाहेर मी जाऊ नये यासाठी ठाकरे सरकारच्या पोलिसांनी गुंडगिरी करत मला आडवले, म्हणून याप्रकरणी आधिकृत तक्रार करण्यासाठी मी पोलीस ठाण्यात आलो आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.
दरम्यान, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यानंतर सोमय्या हे मुश्रीफांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी कोल्हापुरला जाणार होते, मात्र राडा होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्यांना अडविले होते. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी बेकायदेशीररित्या अडवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांविरोधात ही तक्रार दाखल केली आहे.