कोरोना महामारीच्या काळात हाफकिन संस्थेला कोवॅक्सिन लस बनवण्यास मान्यता मिळाली ही दिलासादायक बातमी आहे. हाफकिन संस्थेला कोरोना लस तयार करण्याची परवानगी मिळावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिले. हे पत्र लिहिल्यानंतर हाफकिन सारख्या संस्थेला लस निर्मिती करण्याची मान्यता मिळाली. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्यानंतर काही अवधीत कोरोना लसीला मान्यता मिळाली, यालाच ‘ठाकरे ब्रँड’ म्हणतात, अशा आशयाचं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिंग ला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता.पण त्याची परवानगी राजसाहेबांचं पत्र गेल्यावर आली याला म्हणतात "ठाकरे ब्रँड".करोना काळात "राजकारण" नको म्हणण्याऱ्यानी आभार मानायला हरकत नव्हती.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 17, 2021
‘ठाकरे ब्रँड’ वरुन मनसेने साधला सरकारवर निशाणा
‘राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिनला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पण त्याची परवानगी राज ठाकरेंचं पत्र गेल्यावर आली. याला म्हणतात “ठाकरे ब्रँड”. कोरोना काळात “राजकारण” नको म्हणणाऱ्यांनी आभार मानायला हरकत नव्हती.’, असे ट्वीट करत संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
लस उत्पादनास मुभा मिळावी म्हणून राज यांची विनंती
१०० टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन सारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिली, याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण या संकटावर सहज मात करू हे नक्की, असे ट्वीट राज ठाकरेंनी केले आहे.
१००% लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की. @PMOIndia
— Raj Thackeray (@RajThackeray) April 16, 2021
राज ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र
राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीचा होत असलेला तुटवडा यामुळे राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं होतं. या पत्रातून राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लसींचा निर्माण झालेला तुटवडा याकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधलं होतं. यात त्यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याच्या मागणीसह पाच मागण्या केल्या होत्या. यात लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी केली होती. (सविस्तर वाचा)