अरबी समुद्रात दाखल झालेल्या मान्सूनचा प्रवास श्रीलंकेच्या वेशीवर खोळंबला आहे. त्यामुळे भारतात मान्सून दाखल होण्याचा अंदाज बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान केरळमध्ये मान्सून 27 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र हा अंदाज आता बदलण्याची शक्यता आहे. कारण गेल्या तीन दिवसांपासून मान्सून श्रीलंकेच्या वेशीवर अडकून आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी जूनचा पहिला आठवजा उजाडण्याची शक्यता आहे,
दरम्यान सोमवारी मुंबईसह उपनगरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला होता. यानंतर आज मंगळवारी मुंबईसह उपनगरात पावसाच्या रिमझिम सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. (Mumbai Monsoon Update ) यामुळे गरमीने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीप्रमाणात का होईना दिलासा मिळत आहे.
मुंबईतील माहिम, माटुंगा रोड, दादर, वांद्रे, खार रोड या भागात आज सकाळपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली. वांद्रे ते परळ भागात मंगळवारी रिमझिम पाऊस सुरु झाला. तर शिवाय भांडुप घाटकोपरदरम्यानही पावसाच्या सरी बरसल्या. मुंबईतील इतर भागात तसेच ठाणे, पालघर, डहाणू, नाशिक, पुण्यात दिवसा ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाला सुरुवात होत आहे. पण हा मान्सून नसल्याचीच माहिती हवामान खात्यानं दिली आहे.
तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीतील अनेक जिल्ह्यांमध्येही काही दिवसांपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली. याशिवाय नागपूर चंद्रपूरमध्येही ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
भारतातील केरळ राज्यातून मान्सूनला खरी सुरूवात होते. मात्र यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. यानंतर कोकणमार्गे मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. त्यामुळे देशातील मान्सूनचे आगमन लांबले आहे.
27 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज असून 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागराबरोबरच सध्या अरबी समुद्रातूनही जमिनीकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रात 5 जूनपर्यंत मान्सून सुरू होऊ शकतो. याशिवाय 12 जून ते 15 जूनदरम्यान मान्सून संपूर्ण राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.