मुंबई विद्यापीठ आणि कॉलेजांमधील तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण व्हावी आणि राष्ट्रगीताबद्दल आदर निर्माण व्हावा यासाठी विद्यापीठातर्फे महत्वाची घोषणा काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. या पत्रकानुसार कॉलेज परिसरात राष्ट्रगीताचे फलक लावण्याबरोबरच विद्यार्थ्यांनी दररोज राष्ट्रगीत म्हणावे, अशी ताकीद देण्यात आली आहे. मात्र विद्यापीठाच्या या नियमाला मुंबईतील जवळपास सर्वच कॉलेजांनी हरताळ फासल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रगीताविषयीची अनास्था दिसून आली आहे.
मुंबईसह देशभरात राष्ट्रगीत सक्तीचे करण्यावरुन अनेक वाद निर्माण झाले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी संघटनांनी याविरोधात आवाज उठविल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने राष्ट्रगीताबाबत २०१४ एक परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार कॉलेजच्या आवारात राष्ट्रगीताचे मराठी आणि हिंदी भाषेमधील अनुवाद फलकावर लावणे आणि दररोज राष्ट्रगीत म्हटले जावे असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आज चार वर्षे उलटून देखील या निर्णयाचे धिंडवडे उडाल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईतील काही कॉलेजंमध्ये तर फलकावर राष्ट्रगीताचे अनुवाद लावलेच गेले नसल्याचे आपलं महानगरच्या पाहणीत दिसून आले आहे. विशेष म्हणजे या परिपत्रकानुसार विद्यापीठाच्या सर्व संस्थांनादेखील हा नियम लागू केला होता. मात्र त्याठिकाणी देखील हे नियम पाळले जात नसल्याचे समोर आले आहे.
या सर्व प्रकरणाबाबत बोलताना मनविसेचे संतोष गांगुर्डे म्हणाले की, यासंदर्भात मनविसेने या अगोदरही आंदोलन केले होते. राष्ट्रगीतासंदर्भात आम्ही माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांची भेट घेतली होती. मात्र त्यानंतरही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. या नियमांचे पालन न करणार्या कॉलेजांना संलग्नता देताना त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सध्या तरी या विषयावर आपण काहीही भाष्य करु शकणार नाही. याप्रकरणाबाबत योग्य ती माहिती घेऊन त्यानंतरच माहिती देण्यात येईल. – डॉ. दिनेश कांबळे, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ.