छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पहिल्या आरमाराची मुहूर्तमेढ कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी रोवली. मात्र आज हा इतिहासाचा ठेवा नामशेष होण्याचा धोका आहे. कल्याणचे वैभव असणाऱ्या शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याची कोसळलेली तटबंदी बांधण्यासाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, हा निधी लालफितीत अडकल्याने किल्ल्याच्या डागडुजीचे काम रखडले आहे. त्यामुळे शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत किल्ल्यावरीर मंदिराचा पाया खचला असून बुरुज, भिंती कोसळण्याच्या मार्गावर आहेत.
साडेतीन कोटींचा निधी मंजूर
कल्याण शहराच्या प्रवेशद्वारावरच दुर्गाडी किल्ला मोठ्या दिमाखाने उभा आहे. किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतींना तडे गेले आहेत. तटबंदी ढासळली आहे. शिवाय दुर्गाडी देवीच्या मंदिराचा पायाच खचला आहे. वारंवार या किल्ल्याची पडझड होत आहे. तसेच किल्ल्यावर असलेल्या दुर्गामाता मंदिराच्या गाभाऱ्याच्या छताला देखील गळती लागली आहे. किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी दोन वर्षांपूर्वी शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली दीड वर्षांपूर्वी ठेकेदाराने काम देखील सुरू केले.
ठाकरे सरकार याकडे लक्ष देईल का?
ठेकेदाराने किल्ल्याच्या प्रवेशद्वारासह ढासळलेल्या मागच्या बुरुजाचे आणि भिंतीचे काम पूर्ण केले. निम्याहून अधिक काम पूर्ण झाल्यानंतरही मंजूर निधीपैकी फक्त २५ लाख रुपयांचा निधीच ठेकेदाराला देण्यात आला. त्यामुळे ठेकेदाराने काम बंद केले आहे. सध्या कामासाठी वापरण्यात येणारे मिक्सर आणि दगडाचे साचे किल्ल्याच्या आवारातच पडून आहेत. आता याकडे ठाकरे सरकार लक्ष देईल का? असाच प्रश्न आता विचारला जात आहे.