घरठाणे'स्वच्छ वायू सर्वेक्षणा'त ठाण्याने पटकाविला तिसरा क्रमांक, पालिका आयुक्त बांगर यांनी स्वीकारला...

‘स्वच्छ वायू सर्वेक्षणा’त ठाण्याने पटकाविला तिसरा क्रमांक, पालिका आयुक्त बांगर यांनी स्वीकारला पुरस्कार

Subscribe

ठाणे : केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाद्वारे संपूर्ण भारतात आयोजित केलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत ठाणे शहराने देशपातळीवर तिसरा क्रमांक पटकावला आहे. भोपाळ येथे झालेल्या कार्यक्रमात ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. रोख रक्कम 50 लाख व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

हेही वाचा – Rain Update : गोपाळकालाच्या उत्साहात वरुण राजाची हजेरी, मुंबईत पुढील 4 दिवस पावसाचे

- Advertisement -

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागातर्फे हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी निवडण्यात आलेल्या 131 शहरांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. स्वच्छ वायू सर्वेक्षण, MOEF & CCचा एक नवीन उपक्रम, हवेची गुणवत्ता आणि शहर कृती आराखड्यांतर्गत मंजूर केलेल्या उपक्रमांची अंमलबजावणी या आधारावर शहरांची क्रमवारी लावण्यात आली. या स्पर्धेत 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांतून ठाणे शहराने देशात तिसरा क्रमांक पटकावला.

या क्रमवारीसाठी देशभरातून निवडलेल्या एकूण शहरांपैकी 10 लाखांहून अधिक रहिवासी असलेल्या श्रेणी 1अंतर्गत 47 शहरे, 3 लाख ते 10 लाख लोकसंख्येची श्रेणी 2अंतर्गत असलेली 44 शहरे आणि तीन लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली श्रेणी 3 अंतर्गत 40 शहरे आहेत. स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये समाजातील सर्व घटकांमध्ये जागरूकता पसरवणे, स्वचछ हवेच्या आरोग्यावरील फलदायी परिणामांबद्दल नागरिकांना माहिती देणे, वेगवेगळ्या शहरांमधील हवेच्या गुणवत्तेची तुलना करणे आणि सर्वांसाठी स्वच्छ हवेचे ध्येय साध्य करणे ही उद्दिष्टे आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी; बैठकीत घेण्यात आला ‘हा’ निर्णय

शहरातील घनकचरा व्यवस्थापन, रस्ते बांधणी, ई-बस सुविधा, बांधकाम व विनाशक कचरा व्यवस्थापन, औद्योगिक प्रदूषण, शहरांतील पीयूसी सुविधा व पीयूसी तपासणी, रस्त्यांच्या कडेला व दुभाजकांवर वृक्ष लागवड, ई-वाहन चार्जिग सुविधा, शहरातील एकूण वाहनांच्या तुलनेत ई-वाहनांचे प्रमाण, सीएनजी व पेट्रोल पंपांची संख्या, जनजागृतीचे उपक्रम इत्यादी घटकांच्या कसोटीवर स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत मूल्यांकन करण्यात आले.

स्वयंमूल्यांकन आणि तृतीय पक्ष मूल्यांकनाच्या आधारे, स्पर्धात्मक संघवादाच्या भावनेने प्रत्येक गटातील तीन सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांना रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले. शहराची क्रमवारी ही वेगवेगळ्या डोमेनमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरांनी केलेल्या कृतींचे मूल्यांकन करून करण्यात आली. यात एकूण 200 गुणांपैकी 185.2 गुण मिळवून ठाणे शहराने देशात तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत मध्य प्रदेशातील इंदूर शहराने 187 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला असून उत्तर प्रदेशातील आग्रा शहराने 186 गुण प्राप्त करून दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळवला आहे.

हेही वाचा – Aditya-L1 : सेल्फी क्लिक करून आदित्य-एल1 ने कार्यरत असल्याचे दाखविले; पृथ्वी अन् चंद्राचे पाठवले फोटो

चालू वर्षामध्ये शहरामध्ये मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करण्यावर भर देण्यात आला. तसेच, यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाई, एकूण रस्त्यांपैकी काँक्रिट आणि मास्टिक रस्त्यांच्या प्रमाणामध्ये झालेली वाढ त्यामुळे धुळीचे प्रदूषण कमी होण्यासाठी निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती, शहरामध्ये मो्ठया संख्येने येत असणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस आणि राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमातंर्गत प्राप्त निधीचा कालबद्ध व गुणवत्तापूर्ण विनियोग या बाबींमुळे ठाणे शहराला हा बहुमान प्राप्त झाला. या माध्यमातून भविष्यामध्ये शहरातील सर्वच स्मशानभूमींमध्ये गॅस आधारित शवदाहिनी निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. तसेच पीएमई बससेवा कार्यक्रमाच्या माध्यमातून ठाणे परिवहन उपक्रमाकडील इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे, अशा प्रकारे ठाणेकरांसाठी अधिक आरोग्यदायी वातावरणनिर्मितीमध्ये नक्की हातभार लागेल असे आयुक्त् अभिजीत बांगर यांनी नमूद केले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -