शबरीमला मंदिरामध्ये केवळ हिंदुच प्रवेश करू शकतात का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. शबरीमला मंदिर हे सर्वधर्मीयांसाठी खुलं असल्याचं केरळच्या उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. शबरीमलाचे मंदिर हे सामाजिक सौहार्दाचे प्रतीक आहे. त्यामुळे ते सर्वधर्मीयांसाठी खुले राहणार अशा शब्दात न्यायालयानं याचिकाकर्ते आणि भाजपचे नेते टी.जी. मोहनदास यांना ताकीद दिली आहे. शबरीमला मंदिरामध्ये काही दिवसांपूर्वी एका मुस्लिम महिलेनं प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर मोहनदास यांनी कोर्टात याचिक दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयानं हे अशक्य असल्याचा निर्णय दिला आहे. दरम्यान, यावेळी न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन का केलं नाही? असा सवाल केरळ सरकारला विचारला.
वाचा – शबरीमाला मंदिर महिला प्रवेश; ४५० गुन्हे तर २०६१ जणांना अटक
शबरीमलाचा काय आहे वाद?
केरळमधील शबरीमला मंदिरामध्ये १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा असा ऐतिहासिक निर्णय न्यायालयानं दिला. मात्र, भक्तांनी त्याला विरोध केला. मोर्चे देखील काढले. यावेळी महिलांनी केलेला मंदिर प्रवेशाचा प्रयत्न भक्तांनी यशस्वी झाला नाही. पोेलिसांसह माध्यमप्रतिनिधींना मारहाण देखील झाली. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानं मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यानंतर देखील तणाव वाढतच गेला. महिलांना मंदिरप्रवेशामध्ये काही यश आलं नाही. यावेळी केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी हजारो भक्तांना ताब्यात घेतलं आहे. तर शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, या साऱ्या परिस्थितीमध्ये भाजपनं मात्र भक्तांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. न्यायालयाच्या निर्णयावरून सध्या भक्तांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अद्याप तरी मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी एकाही महिलेला यश आलेलं नाही. १३ नोव्हेंबरला पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी होणार आहे.
वाचा – शबरीमला मंदिर प्रवेश वाद: १३ नोव्हेंबरला पुनर्विचार याचिका