मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर प्रश्नांकडे सत्ताधार्यांसह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येत्या ८ नोव्हेंबरला मराठा समाजाच्या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर सन २००९ पासून लढा सुरू आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून १७ संघटना एकत्र आल्या. मागील पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या आघाडी शासनाने समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. समाजाचे प्रश्न भाजप सोडवू शकेल या आशेवर मराठा समाजाने भाजपला मतदान करून सत्तापरिवर्तन घडविले. मात्र, भाजप शासनानेही समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही.
राज्यभरात मूकमोर्चा
मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसह कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात मूकमोर्चा काढला. त्यानंतरही प्रश्न सोडवण्यात आला नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी नव्या पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीतील पाडव्याच्या दिवशी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली होती. त्या भोर तालुक्यातील रायरेश्वराच्या मंदिरात पाच हजार समाजबांधव शपथ घेऊन पक्षाची घोषणा करतील. या विषयावर चर्चा करण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक होईल. त्यात पक्षाच्या ध्येयधोरणांसह इतर बाबींवर निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.