पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यात सर्वोच्च वाटा असणारे ३ व्यक्तिमत्व म्हणजे, फुले,शाहू,आंबेडकर हे होय. या तीनही महापुरुषांनी आपापल्या कार्यकाळात समाजासाठी, राज्यासाठी आणि देशासाठी प्रचंड भरभरून योगदान दिलं. त्यांनी मांडलेल्या क्रांतिकारक विचारांमुळे समाजात प्रचंड मोठे असे विचारमंथन घडून आले. महाराष्ट्राची आजची प्रागतिक आणि उदारमतवादी प्रतिमा या विचारवंतांनीच घडवली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वरील तिन्ही महान विभूतींकडून देशभरातील लोक नेहमीच प्रेरणा घेत राहिले आहेत.
महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्हीही महापुरुषांनी विपुल प्रमाणात लेखन केलं आहे. बाबासाहेबांचं लिखाण हे बहुतांशी इंग्रजीत उपलब्ध आहे. त्याला मराठीत आणणं गरजेचं होत. महात्मा फुले यांचं लिखाण बरचस असलं तरी बहुतांशी ते अप्रकाशित राहील होतं. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयांची माहिती असली तरी तीचं संकलन झालं नव्हतं. या तिघांनी वेळोवेळी व्यक्त केलेले विचार आणि सामाजिक दृष्टिकोन हे ग्रंथीत होणं गरजेचं होतं.
अशा परिस्थितीत, या तिन्ही महानायकांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याची अत्यंत निकडीची गरज पवार साहेबांनी लक्षात घेतली. पुरोगामी लोकशाही दलाच्या सरकारचे मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधन प्रकाशन समितीची” स्थापना केली.
१९९० मध्ये महात्मा फुले स्मृती शताब्दी आणि १९९१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी साजरी केली गेली. या दोन्हीही शताब्दीच्या निमित्ताने फुले आणि आंबेडकर यांचं उपलब्ध साहित्य संकलित स्वरूपात प्रकाशित करून ते जनसामान्यांना उपलब्ध करून द्यायचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समित्यांची स्थापना देखील करण्यात आली.
परिणामी महात्मा फुले यांचं समग्र साहित्य सुरवातीला ग्रंथरूपात मराठीत एकत्रित प्रसिद्ध करण्यात आलं. त्यानंतर ते खंड स्वरूपात इंग्रजी आणि हिंदीतदेखील उपलब्ध करण्यात आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे एकूण १५ खंड (आतापर्यंत २२) याद्वारे प्रकाशित झाले आहेत.
पुढे जाऊन साहेबांनी, “राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती” ची स्थापणा केली. या समितीने राजर्षी शाहू महाराज यांच्या विषयीच्या साहित्याचे संकलन करून त्याला प्रकाशितही केले.
सर्वसामान्य लोकांना या महापुरुषांचे साहित्य अतिशय परवडणाऱ्या दरात विपुल प्रमाणात उपलब्ध करून देण्यात पवार साहेबांनी मोलाची भूमिका बजावली. या सर्व साहित्याची किंमत देखील अतिशय माफक राहील याची काळजी पवार साहेबांनी घेतली होती. परिणामी राज्यात आणि देशभरात मोठ्या प्रमाणावर या तिन्ही महापुरुषांच्या विचारांचा प्रसार अजून जोमाने झाला.