कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याने नाशिक जिल्ह्यातल्या येवला, सिन्नर आणि निफाड तालुक्यात निर्बंध लागू करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर पालकमंत्री बोलत होते.
तीन तालुके वगळता अन्यत्र कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. विशेषतः निफाड आणि येवला तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्यानं अधिक सतर्कता बाळगली जातेय. या तालुक्यांमध्ये रुग्ण आढळल्यास यापुढे होम क्वारंटाईन राहण्यास परवानगी दिली जाणार नाही. तर, अशा रुग्णांना थेट रुग्णालयांमध्येच दाखल करावं लागेल. कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नसताना, नियम पूर्णपणे पाळले जात नाहीत. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास पुढे बाजारपेठा बंद कराव्या लागतील असा इशाराही पालकमंत्री भुजबळांनी दिला.