नवीन अंशदायी योजना रद्द करून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील १२ लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एक तास ठिय्या आंदोलन केले. नवीन अंशदायी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नाही. ही योजना सुरु झाल्यापासून गेल्या १६ वर्षात मृत्युमुखी पडलेल्या १ हजार ६२२ कर्मचाऱ्यांच्या वारसांना अतिशय तुटपुंजी रक्कम मिळाल्याने कुटुंबियांचे आयुष्य उध्वस्त झाल्याचा आरोप बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने केला आहे. त्यामुळे ही योजना रद्द करण्याची प्रमुख मागणी असल्याचे मंत्रालय कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड म्हणाले. या आंदोलनात राज्यातल्या ३६ जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचारी आणि मंत्रालयीन कर्मचा-यांनी भाग घेतल्याचा दावा संघटनेने केला आहे. सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ठराव आगामी हिवाळी अधिवेशनात मंजूर करून त्याची शिफारस केंद्र सरकारला करावी, अशी मागणी अविनाश दौंड यांनी केली आहे.
हेही वाचा – RBI Governer Shaktikant Das : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ ३ वर्षांनी वाढवला