देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इंधनासह जीवनाश्यक वस्तूंच्या किमतीही वाढत आहेत. भाजीपाला तसेच अन्नधान्य देखील महागले आहे. तीनच दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आल्याने घरगुती गॅस सिलिंडरचे दर हजार रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे सर्वसमान्य वस्तुंचे दर कमी होण्याच्या प्रतिक्षेत असताना दुसरीकडे मात्र माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महागाईचे समर्थन केले आहे.
सदाभाऊ खोत हे चाळीसगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असतना त्यांना महागाईबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर खोत यांनी महागाईचे समर्थन करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “इतर कोणताही पक्ष महागाईचे समर्थन करण्याचे धाडस करणार नाही, मात्र मी ते धाडस करतो. मला सांगा महागाई कुठे आहे? सोने 20 हजार रुपये तोळ्यावरून 50 हजारांवर पोहोचले मात्र लोक सोने खरेदी करतच आहेत. महागाई वाढली म्हणून लोकांनी दारू पिणे सोडले का? उलट कांदा, डाळींच्या किमती वाढल्या तर शेतकरी सुखी होईल, महागाईचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो”, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.
तीन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ करण्यात आल्याने सिलिंडरचे दर 999.50 रुपयांवर पोहोचले आहेत. एक मे रोजी व्यवसायिक सिलिंडरच्या दरात देखील वाढ करण्यात आली होती. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या वतीने केंद्रावर निशाणा साधण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले होते.
हेही वाचा – नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ बॉम्ब सदृश्य वस्तू; परिसरात एकच खळबळ