मुंबई : शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर दोन्ही गटांमध्ये आता शाब्दिक युद्ध रंगले आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरें यांच्या विचाराने चालणारा आपला गट असल्याचा दावा दोन्हीकडून केला जात आहे. याच मुद्दयावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध केला. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करणे योग्य नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने घेतली आहे. शिवाय, महाविकास आघाडीत सहभागी झाल्यावर शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाशी फारकत घेतल्याचा दावाही शिंदे गटाने केला आहे. याच मुद्द्यांवरून शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची, हा वाद निर्माण झाला असून तो आता निवडणूक आयोगाच्या दरवाजात गेला आहे.
हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बाबासाहेब पुरंदरेंनी अन्याय केला; शरद पवारांचा आरोप
शिवसेना संघटनेवरती फुटीरांना खरी शिवसेना कोणाची हे पुरावे सादर करण्याची वेळ आणावी यासारख महाराष्ट्राच दुर्दैव नाही. पण ज्या दिल्लीश्वरांना बाळासाहेब ठाकरे यांचीं शिवसेना संपवायची आहे, त्यांचे हत्यार म्हणून महाराष्ट्र व मराठी माणसांच्या विरोधात हे वापरले जात आहेत. वरून बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा हे सर्व पाहतो आहे, तो तुम्हाला माफ करणार नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.
तर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपासोबत सत्ता स्थापन केली आहे. ही आम्ही घेतलेली ही भूमिका बाळासाहेब ठाकरे यांना आवडणारी आहे. त्यांनी कधीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना जवळ केले नाही, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे.
हेही वाचा – गटातटाच्या राजकारणावरून दोन ‘रामां’चा संयम सुटला, एकमेकांना शिव्यांची लाखोली!