आशिया कपसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या संघात आयपीएलचा हिरो आणि धडाकेबाज सलामीवीर इशान किशन, संजू सॅमसन यांना संधी मिळाली नाहीये. त्यामुळे संघाची घोषणा झाल्यानंतर आपले नाव संघात नसल्याचे पाहून इशान किशन नाराज असल्याचे दिसून आले आहे. आशिया चषकात त्याची निवड न झाल्याने किशनने भावनिक वक्तव्य केले आहे.
काय म्हणाला इशान किशन?
निवडकर्ते जे करतात ते योग्य आहे. खेळाडूंची निवड करताना कोणाला आणि कुठे संधी द्यायची याचा खूप विचार केला. हे माझ्यासाठी सकारात्मक आहे. कारण माझी निवड झाली नाही तर मी अधिक मेहनत करेन. अधिक धावा काढण्याचा मी प्रयत्न करेन. निवडकर्त्यांचा माझ्यावर विश्वास असेल तेव्हा मला संघात नक्कीच ठेवतील, असं इशान किशन म्हणाला.
टी-२० क्रिकेटमध्ये इशान किशन भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने १४ डावात ३०.७१ च्या सरासरीने ४३० धावा केल्या आहेत. या वर्षात भारतासाठी तीन अर्धशतकं झळकावली आहेत. यामध्ये त्याने ८९ इतक्या सर्वोत्तम धावा केल्या आहेत. इशान किशनने यावर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून १४ सामने खेळले. ज्यामध्ये त्याने ३२.१५ च्या सरसरीने ४१८ धावा केल्या आहेत.
आशिया चषकाचा पहिला सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. येत्या २७ ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरूवात होणार असून, दुबईत होणार आहे. मात्र या सामन्यात भारतासमोर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीचे मोठे आव्हान असणार आहे. कारण मागील टी-२० विश्वचशकात शाहिनने भारताचे तीन आघाडीचे फलंदाज बाद केले होते.
आशिया कपसाठीचा असा असेल भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुडा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
आशिया कपसाठी असा असेल पाकिस्तान संघ :
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ इली, फख्र जमां, हैदर अली, हैरिस रउफ, इफ्तिकार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जू., नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर.