मुंबई – शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या स्थानाबद्दल अद्यापही अधिकृत सांगण्यात आलेले नाही. परंतु, हा पक्ष शिवसेनेचा मित्रपक्ष असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यात फार पूर्वीपासून भांडण आहे. यातूनच आंबेडकरांनी पवारांवर मोठा आरोप केला आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.
शिवशक्ती आणि भीमशक्तीची घोषणा झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर आरोप केले होते. शरद पवार आजही भाजपाचेच आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. यावरून राज्याचे राजकारण पुन्हा शरद पवारांवर येऊन ठाकलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांचं नाव न घेता त्यांना सज्जड दम दिला आहे.
महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही. तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी. सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही, असा इशाराच आव्हाडांनी दिला आहे.
महाविकास आघाडी मधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही.तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी.
सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 25, 2023
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते?
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला होता हा दावा करताना प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची आठवण करुन दिली. या शपथविधीचा खुलासा अजित पवार यांनी केला होता. मला दोष कशाला देता. आमच्या पक्षाचा तो निर्णय होता. लोकसभा निवडणुकीआधीच सर्व ठरले होते. मी फक्त पुढे गेलो, असे अजित पावार यांनी सांगितले होते. त्यामुळे शरद पवार हे अजूनही भाजपसोबतच आहेत हे लवकरच कळेल, असे प्रकाश आंबेडकर यांंनी सांगितले.