घरमहाराष्ट्रNCP vs BJP : जात, धर्म, पंथ बघून पवारांनी राजकारण केलं नाही;...

NCP vs BJP : जात, धर्म, पंथ बघून पवारांनी राजकारण केलं नाही; राष्ट्रवादीचे सडेतोड उत्तर

Subscribe

 

 

- Advertisement -

मुंबईः जात, धर्म,पंथ,प्रांत पाहून पवार साहेबांनी कधीच राजकारण केले नाही. परंतु ज्या ज्या ठिकाणी एखाद्या घटकावर अन्याय झाला असेल, विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना संधी मिळाली नसेल, शिक्षणापासून व रोजगाराच्या संधी पासून जे कायम वंचित राहिले अशांचा आवाज बनण्याचे आव्हान शरद पवार साहेबांनी स्वीकारले आणि आपल्या लोकाभिमुख कृतीतून ते यशस्वीरित्या पार पाडलं, असं सडेतोड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनी भाजपला दिलं आहे.

हेही वाचाः“भाजपचे ट्विट महाराष्ट्राची राजकीय संस्कृती संपवणारे”

- Advertisement -

‘भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र’च्या ट्विटर हँडलवर दोन दिवसांत दोन व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना ‘औरंग्याच्या औलादी’ संबोधून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे, असे वृत्त माय महानगरने दिले. त्याची गंभीर दखल घेत राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ता तपासे यांनी भाजपला पत्र लिहिले आहे. भाजपने राजकीय नेत्यांवर टीका करणारे केलेले ट्वीट हे जातीय द्वेष पसरवणारे आहे, असा थेट आरोप तपासे यांनी केला आहे.

शरद पवार यांच्या बद्दल आपल्या मनामध्ये किती गैरसमज आहे हे पाहून मला थोडे आश्चर्य वाटले. शरद पवार एक राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत. गेल्या साठ वर्षाच्या त्यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांची कृती सर्व समावेशक अशी राहिलेली आहे. शरद पवार यांनी आणलेलं महिला धोरण,ओबीसींचा आरक्षण, मागासवर्गीय व आदिवासी समाजाच्या उत्कर्षासाठी अर्थसंकल्पीय तरतूद या गोष्टी शरद पवार हे पुरोगामी विचारांचे प्रतीक आहे, असं तपासे यांनी पत्रात नमूद केलं आहे.

राजकारणाच्या पलीकडे कला, क्रीडा, साहित्य, सहकार, विज्ञान, शेती, शिक्षण, वाणिज्य ह्या सर्व क्षेत्रांमध्ये शरद पवार यांनी भरीव कामगिरी आहे. देशातील जवळपास सर्वच प्रमुख नेत्यांनी हे ओळखले आहे म्हणूनच शरद पवार यांचा आदर सर्वच राजकीय पक्ष व त्यांचे नेते करतात. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळी शरद पवार यांचं गाजलेलं वाक्य सत्ता गेली तरी चालेल परंतु मागास समुदायाची अस्मिता जपली पाहिजे हे बोलण्याचं आणि कृतीतून करण्याचे धाडस फक्त शरद पवारांमध्येच होतं, याची आठवण तपासे यांनी भाजपला करुन दिली आहे.

ज्या मंडल आयोगाला समस्त भारतात विरोध होत होता त्याची अंमलबजावणी प्रथम महाराष्ट्रात शरद पवार यांनी केली आणि खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाला न्याय देण्याची भूमिका ती ठरली. आज भाजपमधील ओबीसी समाजाचे नेते शरद पवार यांच्या या कृतीमुळे मनोमनी त्यांना धन्यवाद देत असतील. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना आरक्षण, भारतीय सैन्य दलामध्ये महिलांना संधी, वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींना अधिकार हे सर्व शरद पवार करू शकले कारण शरद पवारांसमोर सत्तेपेक्षा समानता ही नेहमीच महत्वाची राहिली आहे, असेही तपासे यांनी पत्रात म्हटले आहे.

घोषणातून नव्हे तर कृतीतून जनतेचा विकास करणे आणि समाज माध्यमाच्या चुकीच्या वापरातून इतिहास खोडून काढणे, गैरसमज पसरविणे यातला फरक महाराष्ट्रातली जनता ओळखून आहे. शरद पवारांची कारकीर्द व विकासाचा दृष्टिकोन एका ट्विटमध्ये किंवा एका पानावर लिहिण्यामध्ये मी असमर्थ आहे व शरद पवार यांची माहिती हवी असल्यास मी जरूर ती आपणास मिळवून देईन, असे तपासे यांनी पत्रातून भाजपला सांगितले आहे.

भाजप नेत्यांनी पवारांचा केलेल्या गौरवाचा भाजपलाच विसर

शरद पवार यांनी राबवलेल्या कृषी धोरणाची संयुक्त राष्ट्र स्तरावर प्रशंसाही झाली आणि भारत देशाचा कायमचा अन्नधान्याचा प्रश्न मार्गी लागला याचीही नोंद आपण घेतली पाहिजे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेब जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हा देश पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या प्रमुख पदी वाजपेयी यांनी शऱद पवार यांची नेमणूक केली. २०१४ पासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. नरेंद्र मोदी एकदा बारामतीला आलेले असताना मी राजकारणाचे धडे शरद पवारांचे बोट पकडून शिकलो असे म्हणाले. नंतर २०१७ साली मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित  केले. या सर्व गोष्टींचा आपणाला विसर पडावा याचे आश्चर्य वाटते, असा टोला तपासे यांनी भाजपला लगावला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -