नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील 18 फार्मा कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत. बनावट औषधे बनवल्याच्या आरोपावरून सरकारने ही कारवाई केली आहे. भारतीय औषध महानियंत्रक संस्थेने (डीसीजीआय) अलीकडेच 20 राज्यांतील 76 कंपन्यांची तपासणी केली. त्यानंतर सरकारने परवाना रद्द करण्याची ही कारवाई केली आहे.
Government of India cancels licenses of 18 pharma companies for manufacturing of spurious medicines following inspection by Drugs Controller General of India (DCGI) on 76 companies across 20 States: Official sources
— ANI (@ANI) March 28, 2023
बनावट औषधे बनवणाऱ्या देशभरातील फार्मा कंपन्यांविरोधात केंद्र सरकारने जोरदार मोहीम सुरू केली आहे. भारतीय औषध महानियंत्रक संस्थेने 76 औषध उत्पादक कंपन्यांच्या केलेल्या तपासणीनंतर 18 कंपन्यांमध्ये बनावट औषधे बनविली जात असल्याचे समोर आले होते. संबंधित कंपन्यांवर कारवाई करत सरकारने त्यांचे परवाने रद्द केले आहेत. यासोबतच या कंपन्यांना उत्पादन बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यापैकी 3 फार्मा कंपन्यांच्या विशेष उत्पादनांची परवानगी रद्द करण्यात आली आहे. डीसीजीआयने 26 फार्मा कंपन्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. सुमारे 15 दिवस ही मोहीम राबविण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी डीजीसीआयच्या वैध परवान्याशिवाय औषधे विकणाऱ्या तीन ई-फार्मसी आढळल्या होत्या. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने औषध महानियंत्रकांना कारवाई करण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर ही कारवाई होत आहे.
हेही वाचा – ‘कथाविरहित व्हिडीओ गेमपेक्षा…’, शाहरुखच्या ‘पठाण’वर पाकिस्तानी लेखकाची टीका
एका विशेष मोहिमेअंतर्गत भारतीय औषध महानियंत्रक संस्थेने एकूण 203 फार्मा कंपन्यांची यादी तयार केली. यातील बहुतांश कंपन्या हिमाचल प्रदेश (70), उत्तराखंड (45) आणि मध्य प्रदेश (23) येथील आहेत. भारतीय औषध कंपन्यांनी तयार केलेल्या औषधांच्या गुणवत्तेबाबत मध्यंतरी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तामिळनाडूस्थित ग्लोबल फार्मा हेल्थकेअरने फेब्रुवारीमध्ये आपल्या औषधाची संपूर्ण बॅच परत मागवली होती. तर, गेल्या वर्षी गांबिया आणि उझबेकिस्तानमधील मुलांच्या मृत्यूप्रकरणांमध्ये भारतीय कफ सिरपचा संबंध समोर आला होता.
हेही वाचा – संजय शिरसाटांच्या अडचणीत वाढ; महिला आयोगाने पोलिसांना दिले चौकशीचे आदेश