सध्या परराष्ट्र मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असणाऱ्या अनुभवी राजदूत टी. एस. तिरुमूर्ती यांची संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. तिरुमूर्ती हे भारतीय परराष्ट्र सेवेच्या १९८५ च्या बॅचचे अधिकारी आहेत. सध्या न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधीत्व सय्यद अकबरुद्दीन करत आहेत. मात्र ते लवकरच निवृत्त होणार असल्याचे तिरुमूर्ती यांची त्यांच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता म्हणून काम हाताळलेले अकबरुद्दीन गेल्या अनेक वर्षांपासून संयुक्त राष्ट्रात देशाचे स्थायी प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते. अनेक जागतिक मंचावर वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी भारताची भूमिका चोखपणे मांडली.
हेही वाचा – पैसे भरुनही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बेस्टमध्ये ‘नो एंट्री’
दरम्यान, मंत्रालयातून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली असून, परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात आर्थिक प्रकरणांचे सचिव म्हणून कार्यरत असणारे तिरुमूर्ती यांना संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधि म्हणून नियुक्त करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. शिवाय नम्रता एस. कुमार यांची स्लोवेनियामध्ये देशाच्या पुढच्या राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली असून जयदीप मजूमदार यांच्यावर ऑस्ट्रियामध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संयुक्त सचिव दीपक मित्तल यांना कतारमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्त तर पीयूष श्रीवास्तव यांची बहरीनमध्ये भारताच्या राजदूतपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.