-सुनील शिरवाडकर
पावनखिंडीबद्दल आपण लहानपणापासून ऐकत आलोय. शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचेपर्यंत बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड लढवली. पूर्वी तिचं नाव घोडखिंड होतं..पण बाजीप्रभूंच्या बलिदानाने ती पावन झाली.. म्हणून मग पावनखिंड. काही वर्षांपूर्वी काही शिवप्रेमींनी ठरवलं शिवाजी महाराज या खिंडीतून ज्या प्रकारे गेले तस्साच प्रवास करून गडावर पोहोचायचे. तश्शाच एका पावसाळी रात्री त्यांनी ती पावनखिंड पार केली. गो.नी.दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे यांनी पण अनेकदा ती पार केली. इतिहासप्रेमी जे असतात.. किंवा इतिहासाचे अभ्यासक..ते अशा प्रकारची साहसे करतच असतात.
कालिदासाचं मेघदूत हे एक दीर्घ काव्य. या काव्यातील मेघाचा प्रवास सुरू होतो तो मध्य भारतातून.. साधारण नागपूरमधून निघालेला मेघ उत्तर भारतात कसा जातो. त्याला भारताच्या या भागातील निसर्ग कसा दिसतो याचे वर्णन म्हणजे मेघदूत. मध्यंतरी याच मार्गाने एकाने प्रवास केला.. हेलिकॉप्टरमधून..आणि मेघदूतामधील वर्णन अनुभवलं. सिंदाबादची सफर पण आपण वाचत आलोय.. मूळ अरबी भाषेतील या सुरस कथा. सिंदबादच्या सात सफरी वाचून एकाला वाटलं की आपणसुद्धा अशा सफरी कराव्यात. सिंदबादने ओलांडले तसे..त्याच मार्गाने.. तशाच पद्धतीच्या जहाजातून.
टीम सेव्हरीन हा एक आयरीश संशोधक होता. या संपूर्ण मोहिमेचा खर्च उचलला होता ओमानच्या सुलतानाने. ओमानमधील सोहर हे एक बंदर. सिंदबाद या गावचा होता अशी येथील गावकर्यांची समजूत. त्यामुळे या जहाजाचे नाव ठेवलं गेलं..सोहर. टीम सेव्हरीन ओमानमधील शहरांमधून..बंदरांमधून भटकला. सिंदबाद ज्या प्रकारच्या जहाजातून निघाला होता, ते जहाज नेमकं कसं होतं यावर त्यानं संशोधन केलं. त्याला समजलं की हे जहाज बांधण्यासाठी आपल्याला लाकूड आणावं लागणार आहे. ते भारतातील मलबार किनारपट्टीवर आहे. तो कालीकतला पोहोचला. फार पूर्वी कालीकत बंदरांमधून मसाल्याचा व्यापार चालत असे. येथे येणार्या अरबी जहाजांमुळे येथे बरेच उद्योग बहरले होते. जहाज बांधणारे.. दोरखंड वळणारे..जहाजांसाठी लागणारे लाकूड विकणारे.
येथे आल्यावर सेव्हरीनला समजलं की सागवान लाकडांच्या निर्यातीवर भारत सरकारने बंदी आणली आहे, मग ऐनाचं लाकूड वापरायचं ठरवलं. मंगलोरच्या आसपास जंगलं, टेकड्या धुंडाळल्या. शेवटी कोचीन जवळ हवं तसं लाकूड मिळालं. जहाजाच्या तळाचा भाग हा सगळ्यात महत्वाचा. त्यासाठी साधारण बावन्न फूट लांबीचा सरळसोट वासा हवा होता. बराच तपास केल्यानंतर तोही मिळाला. बाकी महत्त्वाची खरेदी होती काथ्याची. चारशे मैल इतक्या लांबीचा काथ्या मिळणं आवश्यक होतं. लक्षद्वीप बेटावरच्या या विषयातला तज्ज्ञ म्हणजे कुन्हीकोया. त्याच्या सल्ल्यानुसार ही पण खरेदी झाली. फळ्या जोडण्यासाठी पाव टन डिंक.. चुन्याची पोती..जहाजाला बाहेरून लावण्यासाठी माशांचं तेल..ते सहा पिंप..हत्यारे..हातोड्या..अशी ही भली मोठ्ठी यादी.
जहाज शिवण्याची कला असलेली मोजकीच माणसं होती.. तेही लक्षद्वीप बेटावर. मग तेथून दहा माणसं ओमानला आणण्यात आली आणि मग एका शुभ दिवशी जहाज बांधणीला सुरुवात झाली. तो दिवस होता ४ फेब्रुवारी १९८०. काही दिवसांतच सोहर नावाचं ते भव्य जहाज उभं राहिलं.
मस्कतमधील बंदरात जहाज उभं राहिलं.. अगदी मध्ययुगीन काळात होतं तसं. मग त्यावर एक एक साहित्य जमा होऊ लागलं.जनरेटर..कंदील..लाईफ जॅकेट्स.. खाद्य वस्तू..हजारो अंडी.. कांदे बटाटे.. आणि ओमानी खजुर. सोहरवर कमीत कमी वीस कर्मचारी होते. परंपरागत जहाज हाकण्याची कला असलेले खलाशी.. देखभाल करणारे..शिडं हाताळणारे.. त्याशिवाय रेडिओ ऑपरेटर.. कॅमेरामन.. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शास्त्रज्ञ. २३ नोव्हेंबर १९८० या दिवशी सोहरची वाटचाल सुरू झाली. ज्या मार्गाने आठव्या शतकात सिंदबाद गेला होता..त्यांचं मार्गाने सोहर निघालं. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोहर लक्षद्वीप बेटावर आलं. इथून पुढे कालीकत.. मग श्रीलंका.
पंचावन्न दिवसांच्या प्रवासानंतर सोहर सुमात्रा बेटावर पोहोचलं. नंतर सिंगापूर आणि शेवटी चीनचा किनारा. नकाशा पुढे ठेवून बघितलं तर कळतं की सेव्हरीनची ही सफर सुरू झाली मस्कतपासून. अरबी समुद्र.. हिंदी महासागरातून सहा हजार मैलांचा प्रवास करत साडेसात महिन्यांनी ही सफर पूर्ण झाली. खलाशांचं जीवन तसं धोक्याचचं असतं. सोहरवरील निम्मे खलाशी कधी ना कधी संकटात सापडले होते. अनेक संकटांचा सामना करत टीम सेव्हरीनची ही सफर पार पडली. ती मूळच्या सिंदबादच्या सफरीइतकीच रोमांचक होती. या प्रवासाचा सुरस तपशील आपल्याला वाचायला मिळतो तो टीम सेव्हरीनने लिहिलेल्या आपल्या पुस्तकात..१९८२ सारी प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाचे नाव आहे..‘दि सिंदबाद व्हॉयेज’.