छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पक्षात नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. त्यामुळे नाराज असलेले दानवे पक्षाला रामराम करत शिवसेना शिंदे गट किंवा भाजपात प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात होते. परंतु, याबाबतचे स्पष्टीकरण देत अंबादास दानवे यांनी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. तर, त्यांच्याबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा करणार असल्याचे अंबादास दानवे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Ambadas danve got angry with those who spread fake news)
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. या चर्चांना पूर्णविराम लावण्यासाठीच आज अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दानवे संतापलेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी त्यांच्याबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना इशारा दिला. यावेळी ते म्हणाले की, ज्या प्रसार माध्यमांनी बातमी चालवली, त्यांनी ही बातमी खोटी बातमी दिली. त्यामुळे माझ्याबद्दल खोट्या बातम्या दिल्या त्यांच्यावर मानहानी दावा करणार आहे, असा इशाराच दानवे यांच्याकडून देण्यात आला आहे.
मी 30 वर्ष जुना शिवसैनिक आहे. त्यामुळे ज्यांनी खोट्या बातम्या चालवल्या त्यांच्यावर अधिकृत कारवाईही केली जाईल. मी शिवसेनेचा आहे. मी गटप्रमुख पदावरून विरोधी पक्ष नेता झालो आहे, त्यामुळे निवडणूक येतात जातात पण मी जाणार नाही. चॅनेलच्या टीआरपीसाठी काहीही चालवू नका. आता भाजपात जाण्याचा प्रश्नच येत नाही. ज्यामुळे माझ्या 30 वर्षांच्या प्रतिष्ठेला खराब करण्याचे काम ज्यांनी केले आहे, त्यांना लीगल नोटीस पाठवणार असल्याचे सांगत अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांना खडेबोल सुनावले आहेत.
या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांनी भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी केलेला दावाही खोडून लावला. मी गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेत आहे. शिवसेना आणि भाजपाची 25 वर्ष युती होती. त्यामुळे त्यांचे आणि आमचे विचार सारखे होते. त्यामुळे मी पूर्वाश्रमीपासून भाजपाचे आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचेही दानवे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच, मी काम करणारा शिवसैनिक आहे, लढणारा शिवसैनिक आहे, असे सांगत दानवे यांच्याकडून सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.