बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. आज बाळासाहेब असते तर विरोधकांना गप्पच केले असते. त्यांच्या फक्त असण्यानेच परिस्थिती वेगळी असती, अशा शब्दा प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना बाळासाहेबांची राजकीय कारकीर्द तसेच मराठी माणसासाठी तसेच हिंदुत्वासाठीचे योगदान याबाबतच्या योगदानाला तसेच आठवणींना उजाळा संजय राऊतांनी दिला. तसेच आपल्या आय़ुष्यावर बाळासाहेबांचा कसा प्रभाव राहिला याबाबतची आठवणही यावेळी त्यांनी सांगितली.
विरोधकांची जी फडफड, तडफड सुरू आहे
आता जी विरोधी पक्षामध्ये कावकाव, चिवचिव सुरू आहे, जी फडफड, तडफड सुरू आहे, ती बाळासाहेबांच्या अस्तित्वाने थंड पडली असती. बाळासाहेबांचा स्वभाव हा सौ सोनार की एक लोहार असा होता. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे धनुष्याचा बाण होता, बंदुकीची गोळी होती. ती वेधच घ्यायची, नेम चुकत नव्हता. बाळासाहेबांनी कधीही कुणावर अन्याय होऊ दिला नाही. ते सत्य आणि न्यायाच प्रतिक होते. त्यांचे जीवन म्हणजे धगधगते अग्निकुंड होते. त्या अग्निकुंडात महाराष्ट्रासाठी देशासाठी ते सतत विचारांचा वणवा पेटवत राहिले.
बाळासाहेबांनी सगळ विष कवेत घेतले
बाळासाहेब हे सगळ्या राजकीय पक्षांना प्रिय होते. राजकीय पक्षांसोबत त्यांचे मतभेद असतीलही. पण देशातील प्रमुख राजकीय व्यक्तीला वाटत होत कधी तरी जाऊन बाळासाहेबांना जाऊन भेटावे, त्यांच्याशी बोलाव. हे त्यांचे राजकीय आकर्षण होते. त्यामुळे जे त्यांना भेटू शकले नाहीत, त्यांना नेहमीच आयुष्यात वाटत राहीलं की, आम्ही आयुष्यात सगळ पाहिले पण बाळासाहेबांची भेट झाली नाही, अनेकांची ती इच्छा अपूर्ण राहिली. प्रत्येकाला त्यांच्या जवळ जावस वाटत होतं. बाळासाहेबांनी जेवढ शक्य झाले, तेवढे विष त्यांच्या कवेत घेतले. अशा बाळासाहेबांचे स्मरण देशाला राहिल. मराठी माणुस त्यांचा सदैव ऋणी राहील. मराठी माणसाला मुंबईत, महाराष्ट्रात नव्हे देशात स्थान मिळवून द्यायचे संपूर्ण श्रेय बाळासाहेबांना आणि त्यांच्या आयुष्यातील ५० वर्षांच्या संघर्ष, त्यागाला आहे.
मी बिघडू नये यासाठी बाळासाहेबांचा हंटर…
बाळासाहेबांच्या माझ्या आयुष्यावर फार मोठा प्रभाव. त्यांच्या आशिर्वाद लाभला. त्यांनी माझ्यासाऱख्या मातीच्या गोळ्याला आकार दिला. अवघ्या २८ व्या वर्षी सामनाचा संपादक बनवला, तरूण वयात नेता बनवला. शिवसेनेच्या नेतृत्व मंडळात स्थान दिले. त्यांनी मला अनेक वर्षे राज्यसभेत पाठवले. त्यांनी मला घडवतानाच मी बिघडू नये यासाठी सतत त्यांचा हंटर माझ्या अवती भवती फिरत होता. सामान्याला शूरवीर करण्याची ताकद त्यांच्यात होती. त्यांच्या सहवासातील माणुस लढण्याची प्रेरणा घेऊनच जायचा. बाळासाहेब दुसरे होणार नाहीत.
व्यंगचित्रातील मॉडेल्स मिस केल्याची बाळासाहेबांची कबुली
बाळासाहेबांनी कुंचला हाती घेतला की अनेकजण थरथरायचे. आज माझा हात थरथरतो आणि मी व्यंगचित्र काढू शकत नाही हे त्यांचे दुःख होते. बाळासाहेबांनी जेव्हा कुंचला खाली ठेवला तेव्हा बाळासाहेब म्हणाले की, प्रेरणा देणारे मॉडेल्स दिसत नाही. बाळासाहेबांनी जेव्हा व्यंगचित्र काढायला सुरूवात केली तेव्हा चर्चिल, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, गुलजारीलाल नंदा, एस के पाटील, जॉर्ज फर्नांडिस यासारखे नेते होते. त्यावेळची व्यंगचित्रे काढताना देशातील राजकीय नेते हे बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचे मॉडेल्स होते. ते सगळे राजकारणातून दूर झाले किंवा निधन झाले, तेव्हा पोकळी निर्माण झाली. मी व्यंग चित्र काढावी असे मॉ़डेल्स राहिले नाहीत, असे बाळासाहेब म्हणाले. पण अचानक जेव्हा देशाच्या राजकारणात सोनिया गांधी आल्या, सोनिया गांधी, नरसिंह राव, सीताराम केसरी आले तेव्हा बाळासाहेब म्हणाले की मी ही मॉडेल्स मिस केली.