विदर्भ-मराठवाडयासह राज्यातील अनेक भागाला पावसाने झोडपले आहे. अतिवृष्टी आणि पुराने नुकसानग्रस्त शेतक-यांना हेक्टरी ७५ हजार रुपये तर फळबागांना दीड लाख मदत देण्यात यावी. तसेच राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेउन केली. राज्य विधिमंडळाचे अधिवेशनही तातडीने बोलवावे, अशी मागणीही राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने केली आहे.
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा अजित पवार यांनी नुकताच दौरा केला.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची त्यांनी काल भेटही घेतली. आज मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्रयांची भेट घेऊन दिलासा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली.
विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत द्यावी. घरे आणि दुकानांत पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी. अतिवृष्टीने झालेले शेतजमीन आणि पिकांचे नुकसान लक्षात घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, आदी मागण्या राष्ट्रवादीने केल्या आहेत.