मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले. परंतु या दोन्ही गटातील राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. अगदी राज्यापासून दिल्लीपर्यंत दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
दीपक केसरकर यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ज्या लोकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी लढा दिला. ते लोक इतक्या सहजासहजी शिवसेना सोडून जाणार नाहीत. तसेच निश्चितपणे काहीतरी घडल्याशिवाय आमदार शिवसेना सोडणार नाहीत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण केल्यास आम्ही आणि शिवसेना एकत्र येण्याला वेळ लागणार नाही, असे संकेत दीपक केसरकर यांनी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांचं मन जिंकलं आहे. त्यामुळेच सर्व आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत. त्यावेळी काय झालं हे मी सांगणार नाही. कारण ते मी मनाच्या कोपऱ्यात दडवून ठवलं आहे. त्यामुळे एक ते दोन दिवस जाऊ द्या. ज्यावेळी मी बोलेन तेव्हा संपूर्ण राज्यातील प्रत्येक शिवसैनिकाला सत्य समजणार, असंही केसरकर यांनी म्हटलं आहे.
मागील काही दिवसांपूर्वी नागपुरात विधीमंडळातील शिवसेनेच्या कार्यालयावरूनही दोन्ही गटात संघर्ष झाला होता. आता दीपक केसरकर यांनी ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार असल्याबाबत वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा : नाशिकच्या जिंदाल कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट; अनेक कर्मचारी जखमी