तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचा डाव आखल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे सूडाचं राजकारण करत नसल्याचा दावा ठाकरे गटाने करत फडणवीसांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्यासोबत जे काही केलं ते मी विसरणार नाही, सर्वांचा हिशोब होणार असा इशारा आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांना दिला आहे. कंबोज यांनी ट्विटवर या दोन्ही नेत्यांना एक ट्विट टॅग करून हा इशारा दिला आहे.
मोहित कंबोज यांनी ट्विट करत म्हटले की, माझ्यावर जमावाने हल्ला करुन माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला. मला अटक करण्यासाठी माझ्याविरोधात खोट्या आणि बनावट खटले दाखल केले. माझे घर आणि कार्यालय पाडण्यासाठी नोटीस पाठवल्या. 57 नोटीस आणि रात्रदिवस माझ्या कुटुंबाला आणि मुलांना धमकवण्यात आले, असा आरोपही त्यांनी केली आहे.
माझ्यासह भाजपच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला हवं, महाविकास आघाडी सरकार आणि त्यांच्या नेत्यांनी कशारितीने खोट्या केस करुन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यांना चुकीची वागणूक दिली. प्रत्येक अपमान लक्षात ठेवा, प्रत्येक अत्याचार लक्षात ठेवा या सर्वांचा हिशोब होणार आहे. तसेच गिरीश महाजन, किरीट सोमय्या, प्रविण दरेकर, आशिष शेलार, प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर, नितेश राणे, नारायण राणे, चित्रा वाघ, नवनीत राणा, रवी राणा आणि महाराष्ट्रातील अनेक भाजप कार्यकर्ते ज्यांच्यावर मविआ सरकारच्या काळात अन्याय झाला या सर्वांनी त्यांचा अपमान लक्षात ठेवायला हवा असं आवाहनही मोहित कंबोज यांनी केलं आहे.
इन सब को अपना अपमान याद रखना चाहिए : @girishdmahajan @KiritSomaiya @mipravindarekar @ShelarAshish @PrasadLadInd @GopichandP_MLC @NiteshNRane @MeNarayanRane @ChitraKWagh @navneetravirana @mlaravirana_ysp और अनेक महाराष्ट्र बीजेपी के कार्यकर्ता जिनपे MVA ने अत्याचार किया !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) January 27, 2023
दरम्यान फडणवीसांनी केलेल्या आरोपांनंतर आता भाजपमधील अनेक नेते मंडळी मविआ सरकारवर आरोप करत आहे. यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच विधान हास्यास्पद आहे, दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या विधानावर सविस्तर बोलले आहेत. देवेंद्रजी आपस ये उम्मीद न थी अशा खोट्या नाट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा पुण्यात कोयता गँग, धायरीत गोळीबार झाला अशा घटना घडल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री त्यांनी यावर बोलणे अपेक्षित होते. त्यांना विनम्र विनंती आहे की, पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सगळीकडे गुन्हेगारी वाढत आहे. अशा परिस्थितीत त्यांनी यावर बोलावे, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.