मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारला आज, शुक्रवारी एक वर्षं पूर्ण झाले. परंतु अद्याप दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी वारंवार दिली. परंतु आता दिल्ली दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात होणार असल्याचे सूचक विधान केले आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार ही केवळ अफवा असल्याचा दावा, राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार ही केवळ अफवा!! अंतर्गत कलहामुळे विस्तार होणार नाही आणि झालाच तर सरकार टिकणार नाही. एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी यांच्यामध्ये शीत युद्ध.ठिणगी पडली आहे. लवकरच ज्वालामुखी होईल.wait an watch #वर्षपुर्ती
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 30, 2023
राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार गेल्या वर्षभरापासून रखडला आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2022 रोजी शपथ घेतली. यानंतर 9 ऑगस्ट 2022ला 18 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. परंतु त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे दोन्ही पक्षांतील आमदारांसह विरोधकांची नजर लागून राहिली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना दिल्ली दौऱ्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, राज्याचे अनेक प्रश्न असतात त्यासंदर्भात आम्हाला भेट घ्यावी लागते, त्या प्रश्नांचा पाठपुरावा करावा लागतो. अनेक वेळेला त्यासंदर्भात बैठका देखील असतात. आम्हाला मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे. मुख्यमंत्री त्याबद्दल निर्णय घेतली, पण मला वाटतं जुलै महिन्यांमध्ये विस्तार करू, असे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा – पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…, भाजपा आणि शिवसेनेच्या जाहिरातबाजीवर काँग्रेसची टीका
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार ही केवळ अफवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अंतर्गत कलहामुळे विस्तार होणार नाही आणि झालाच तर सरकार टिकणार नाही, असा दावा करतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शीत युद्ध सुरू आहे. त्यातच ठिणगी पडली असून लवकरच ज्वालामुखी होईल. त्यामुळे वेट अॅण्ड वॉच, असे आमदार मिटकरी यांनी म्हटले आहे.