राज्यात काल, बुधवारी एकही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. १ एप्रिल २०२० पासून पहिल्यांदाच राज्यात काल एकही कोरोना मृत्यूची नोंद झाली नव्हती. तसेच काल ५४४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत किंचित घट झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४६७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८ लाख ६७ हजार ३९१वर पोहोचली असून १ लाख ४३ हजार ७१८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ४ हजार ९५३ कोरोना सक्रीय रुग्ण आहेत. आज दिवसभरात राज्यात २३४ ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. हे सर्व रुग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत.
राज्यात आज १ हजार १४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ७७ लाख १४ हजार ७१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ८० लाख ६५ हजार ९६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ६७ हजार ३९१ (१०.०८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४२ हजार ११८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६०२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज दिवसभरात राज्यात २३४ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. हे सर्व ओमिक्रॉनचे रुग्ण आज एकट्या मुंबईत आढळले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ५हजार ५ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. यापैकी ४ हजार ६२९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ९ हजार ३८२ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ८ हजार ७१४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ६६८ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.