ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात ते नैतिकतेवर बोलले. उद्धव ठाकरे आणि नैतिकता यांचा काहीही संबंध नाही. कधीच त्यांचा आणि नैतिकतेचा संबंध आला नाही. 2019 ला शिवसेना आणि भाजप संयुक्त निवडणूक लढले, निकाल लागला आणि उद्धव ठाकरे बीजेपीसोबत आले नाहीत. शरद पवार मुख्यमंत्री पद देत आहेत, म्हणून यांनी नीतीमत्ता, हिंदूत्व याला सोडचिठ्ठी देत नैतिकतेचा बोजवारा उडवला आणि उद्धव ठाकरे आज नैतिकतेवर बोलतात, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. ( Maharashtra Politics Union Minister Narayan Rane Criticized Uddhav Thackeray over Morality topic ) नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे.
उद्धव ठाकरे नैतिकतेचा दाखल देत राजीनामा द्या, असं बोलत आहेत परंतु आमच्या विरोधात निकाल लागला नाही, मग राजीनामा का द्यायचा, असा सवाल नारायण राणेंनी केला आहे. नैतिकता, निष्ठा आणि प्रामाणिकपणा यावर बोलण्याचा ठाकरेंना अधिकार राहिलेला नाही, असं राणे यावेळी म्हणाले.
राजीनामा दिला नाही द्यावा लागला
नैतिकतेच्या आधारावर निर्णय दिल्याचं, ठाकरे म्हणाले. पण त्यांनी तो राजीनामा दिला नाही तर त्यांना द्यावा लागला. एकनाथ शिंदे तुमच्या डोळ्यांसमोर 40 आमदार घेऊन गेले. तेव्हा हिंमत नाही थांबवायची आणि आता बोलतात नैतिकता, असं म्हणत राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसंच, कालपर्यंत ठाकरे गटाला वाटत होतं की, सर्वोचच्च न्यायालय शिंदेंना उठवून ठाकरेंना बसवेल. पण तो काय गणपती आहे का बसवायला, अशी मिश्किल टिप्पणी राणेंनी केली.
उद्धव ठाकरेंना सामान्य ज्ञानही नाही
उद्धव ठाकरे म्हणतात की, राज्यपाल पद ठेवावं की नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. परंतु ठाकरेंना सामान्य ज्ञानदेखील नाही, की राज्यापालांबाबत निर्णय सर्वोच्च न्यायालय नाही, तर राष्ट्रपती घेतात. घटना माहिती की नाही, नाहीतर वकिलांना विचारा , इतकं बेसिकही ठाकरेंना माहिती नसल्याचं राणे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाकडून आलेला निर्णय हा न्याय देणार आहे. तसंच लोकशाहीचा विजय आहे. तसंच, संजय राऊत मंडळींचा पालापाचोळा करणार निर्णय असल्याचं राणे म्हणाले.