मुंबई : मुंबईत रेल्वे पाठोपाठ सार्वजनिक व स्वस्त प्रवास देणाऱ्या बेस्ट उपक्रमात सध्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला या आंदोलनाला 3 ते 4 बस डेपोमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला. पण काल गुरुवारी जवळजवळ 8 ते 9 बस डेपोमधील कंत्राटी वाहक आणि चालक सहभागी झाले. ज्यामुळे अनेक मार्गावरील बसेसच्या फेऱ्या या रद्द करण्यात आल्या. परंतु आज या आंदोलनाचा तिसरा दिवस असून याचा नाहक त्रास हा मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. तर बेस्टला देखील याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
हेही वाचा – BEST मधील कंत्राटी वाहक, चालकांचा तिसऱ्या दिवशी संप सुरूच, मुंबईकर त्रस्त
या प्रकरणी राजकीय पक्षांनी देखील मध्यस्थी करण्यास सुरुवात केली आहे. BEST च्या कंत्राटी वाहकांनी आणि चालकांनी आंदोलन केले असून या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने उडी घेतली आहे. मनसेने याबाबतचे ट्वीट करत “ट्रिपल इंजिन सरकार ट्रिपल शक्ती कधी दाखवणार” असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे आता या संपाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या ट्वीटमधून मनसेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचे कारण सांगत राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत. (MNS questions the state government on the strike of BEST contract employees)
मनसेने काय ट्वीट केले आहे?
मुंबईतील बेस्ट प्रशासनाने काँट्रॅक्टर्सकडून लीजवर बसेस घेतल्या आहेत. त्या काँट्रॅक्टर्सच्या बस चालकांनी संप पुकारला आहे. त्याचा आजचा तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांत संपावर जाणाऱ्या चालकांची संख्या वाढत आहे. आणि ह्याचा फटका थेट मुंबईकरांना बसत आहे. बेस्ट प्रशासन झोपलं आहे का? मुळातच ह्या काँट्रॅक्टर्सच्या बसेस रस्त्यात बंद पडणं, त्यांची देखभाल नीट नसणं ह्या तक्रारी होत्याच. ह्या सगळ्यावर बेस्ट प्रशासनाने कधीच कारवाई केल्याचं दिसलं नाही. आणि आता तर थेट ह्या काँट्रॅक्टर्सच्या बस चालकांनी संप पुकारला आणि मुंबई वेठीला धरली गेली.
आमचे काही प्रश्न
1) हा संप होणार आहे त्यावर आधीच कारवाई करावी आणि काही तयारी करावी असं बेस्ट प्रशासनाला वाटलं नाही?
2) काँट्रॅक्टर्स बेस्ट प्रशासनाला वेठीस धरू शकतात आणि त्यातून बेस्ट प्रशासनाची नाचक्की होत आहे ह्याच प्रशासनाला काहीच वाटत नाही का?
3) ह्या काँट्रॅक्टर्सना संप रोखण्यात अपयश आलं म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून, बेस्टला झालेल्या नुकसानीची भरपाई कधी आणि कशी करून घेणार?
4) राज्य सरकार ह्यावर नक्की काय पावलं उचलत आहे. मनसेने हे चार प्रश्न उपस्थित करत हे ट्वीट @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks ला टॅग केले आहे. तसेच आपणांस विनंती आहे की आता तर ट्रिपल इंजिन सरकार आहे, तुमची ट्रिपल शक्ती कधी दिसणार? मुंबईकर त्रस्त आहे. असे सांगितले आहे.
मुंबईतील बेस्ट प्रशासनाने काँट्रॅक्टर्सकडून लीजवर बसेस घेतल्या आहेत. त्या काँट्रॅक्टर्सच्या बस चालकांनी संप पुकारला आहे. त्याचा आजचा तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांत संपावर जाणाऱ्या चालकांची संख्या वाढत आहे. आणि ह्याचा फटका थेट मुंबईकरांना बसत आहे. बेस्ट प्रशासन झोपलं आहे का?… pic.twitter.com/e5Eq5hJm69
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 4, 2023
समाजसेविका प्रज्ञा खजूरकर यांनी आझाद मैदानात बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासांठी आमरण उपोषणाला सुरुवात केली. त्यांना पाठिंबा देण्यासाठी घाटकोपर बस आगारातील 280 कंत्राटी कामगारांनी आझाद मैदान गाठले आणि संपावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज जवळपास सर्वच कंत्राटी चालक आणि वाहक हे संपामध्ये सहभागी झालेले आहेत. तर, जोपर्यंत आपल्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोणीही आगारात जाऊ नये अशी भूमिका या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली आहे.