मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि नवनियुक्त होमगार्ड प्रमुख परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. गृहमंत्र्यांनी दर महिना १०० कोटी रुपयांची मागणी केली असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात केला आहे. याच प्रकरणावरून ठाकरे सरकारविरुद्ध विरोधी पक्ष असा वाद रंगू लागला आहे. यातच राज्यासह केंद्रातील भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगले कोंडीत पडकले आहे. परंतु या प्रकरणावर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी मौन बाळगले आहे. तर काही मंत्री सावध भूमिका मांडत आहेत.
यावर आता काँग्रेसकडून पहिला प्रतिक्रिया मांडण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सावध भूमिका घेत, परमबीर सिंग यांच्या ई-मेलबाबत शंका उपस्थित केली आहे. यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, परमबीर सिंग यांनी हे पत्र त्यांची बदली झाल्यानंतर दिले आहे, हे आपण लक्षात घ्या. या सर्व विषयामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जातीने लक्ष घातल आहेत. परमबीर सिंग यांच्या पत्राच्या सत्यतेबाबत मुख्यमंत्र्यांनाच शंका वाटत असल्याने आम्ही यावर काही वेगळे बोलणे आवश्यक वाटत नाही असे थोरात म्हणाले. या प्रकरणावर आता महाविकास आघाडी सरकारवर राज्यासह केंद्रीय भाजपा नेत्यांनी सडकून टीका करण्यास सुरु केली आहे.
भाजपाचे केंद्रीय नेते रविशंकर प्रसाद यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपा नेत्यांसह राज ठाकरे यांनीही केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारसमोर अडचणी वाढत आहेत.