मागील काही दिवसांपासून राज्यातल्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रोज नवे आरोप केले जात आहेत. दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आपल्या विधानामुळे नेहमी चर्चेत असतात. यावेळी देखील त्यांनी मोठं वक्तव्य केलं असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
रामदास आठवले यांनी संजय राऊत यांच्यावर पक्षात फूट पाडल्याचा आरोप केला आहे. शिवसेना फोडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नसून संजय राऊत होते. राऊतांच्या सांगण्यावरूनच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. संजय राऊत यांनी गडबड केली नसती तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं नसतं. तसेच भाजप-शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रात आलं असतं, असं रामदास आठवले म्हणाले.
शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आली नसती तर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेचं सरकारं आलं असतं, असं आठवले म्हणाले. मात्र, यापूर्वी देखील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप शरद पवारांवर करत पवारांनी पक्षाला पद्धतशीरपणे संपवण्याचं काम केलं आहे, असं कदम म्हणाले होते. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बसला हे आमच्यापैकी कुणालाही मान्य नाही, असं देखील कदम म्हणाले होते.