पुणे : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून पळ काढला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. भररस्त्यात असे होत असेल तर, ‘अब की बार गोळीबार सरकार’ यावर शिक्कामोर्तब झाले असून ट्रिपल इंजिन खोके सरकारचा क्राइमला आशीर्वाद असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Salman Khan : Supriya Sule criticizes state government over Mumbai shootings)
लमान खान याच्या वांद्रेस्थित घराबाहेर आज, रविवारी पहाटे गोळीबार झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. जेव्हा हा गोळीबार झाला तेव्हा सलमान खान घरीच होता, असे सांगण्यात येते. सलमान खान याला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत. बिश्नोई गँगच्या टार्गेटवर नेहमीच सलमान खान राहिला आहे. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई टोळीने गोळीबार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर सलमान खानच्या घराबाहेर पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
महासंसदरत्न सुप्रियाताई सुळे यांनी पुणे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मुंबईत झालेल्या गोळीबारासंबंधी राज्य सरकारच्या कायदा व सुव्यवस्थेवर कठोर शब्दांत टिका केली.#SupriyaSule #Baramati #Pune #AmbedkarJayanti pic.twitter.com/nJUuEizECv
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 14, 2024
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मुंबईत झालेल्या गोळीबारासंबंधी राज्य सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका केली. सलमान खानच्या घराबाहेर झालेला गोळीबार धक्कादायक आहे. भररस्त्यात असे होत असेल तर, ‘अब की बार गोळीबार सरकार’ यावर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. सुसंस्कृत पुण्यात कोयता गँग अधून-मधून डोके का वर काढत आहे? त्याचा एकदाच निर्णय का होत नाही? असे प्रश्न विचारतानाच, ट्रिपल इंजिन खोके सरकारचा क्राइमला कुठेतरी आशीर्वाद, त्याशिवाय हे शक्य नाही, असा ठपका त्यांनी ठेवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुक शरद पवार यांच्यावर टीका केल्याने हेडलाइन होत असल्याचे सत्ताधाऱ्यांना माहीत आहे. पण आपले नाणे 60 वर्षे मार्केटमध्ये खणखणीत आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.