मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिंदे-ठाकरे गटातील वाद आता आणखीनच चिघळत चालला आहे. शिवसेनेत फुट पडल्यापासून दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. “शिंदे गटातील आमदार जास्त काळ समाधानी राहू शकणार नाहीत हे आम्हाला माहीत होते. उद्धव ठाकरेंना सत्तेवरुन खाली आणण्यासाठी भाजपने अनेक प्रयत्न केले, पण ते यशस्वी झाले नसल्याने त्यांनी शिवसेनेचे 40 आमदार फोडले. पण हे 40 आमदार सुद्धा स्थिर राहू नये, यासाठी स्वत: भाजप प्रयत्न करत आहे. भाजपच शिंदे गटाला सुरुंग लावणार” असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. (shivsena leader bhaskar jadhav slams shinde fadnavis government)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते भास्कर जाधव यांनी नालासोपारात कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा घेतला. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी पत्रकारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदे गटावर टीका केली. “जे जे भाजपात गेले ते सर्व क्लिन झाले आहेत. जे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये किंवा त्यांच्या विरोधात आहेत ते चरित्रहीन आहेत. त्याच लोकांनी जर त्यांना सपोर्ट केला किंवा भाजपात गेले तर ते चारित्र्य संपन्न होतात. त्याच संस्कारातून चित्राताई बोलल्या”, असे भास्कर जाधव म्हटले.
“शिवसेनेत असणारे संजय राठोड यांचे प्रकरण भाजपाच्या चित्रा वाघ यांनी फार टोकाचे लावून धरले होते. पण आता त्याच म्हणाल्या की आपण आता विषय संपवूया. चित्रा वाघ यांच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, कारण त्यांनी मला दम दिलाय की माझ्याबाबत बोलू नका. भाजपकडे कोणती मशीन आहे माहीत नाही, पण त्यांच्या मशीनमध्ये ED ची पावडर असावी”, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले. याशिवाय, भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीका केली आहे.
हेही वाचा – गुजरात विधानसभा निवडणुकीत कुटुंबांमध्येच होणार राजकीय लढत; सख्ख्ये येणार आमने-सामने