आगामी काळात येणाऱ्या निवडणुका आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीनं युती करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत राजकीय युतीची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळं आता शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीनंतर ठाकरे गटासोबत आंबेडकरांनी युती केल्यामुळं उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आगामी काळात भाजपविरोधात विविध पक्षांची मोर्चेबांधणी करण्याचं नेतृत्व हे उद्धव ठाकरेंकडे असणार असल्याचा दावा, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
नवीन युतीची सुरुवात झाली आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, चांगलं पर्व सुरू झालं आहे. लवकरच अनेक पक्ष अशा प्रकारे एकत्र येत राहतील. ज्याप्रकारे जे.पी. यांची लोक चळवळ सुरू झाली होती. तीच चळवळ भाजपच्या मुजोरशाही आणि दडपशाहीच्या विरोधात फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात हे चित्र दिसेल की, आगामी काळात भाजपविरोधात विविध पक्षांची मोर्चेबांधणी करण्याचं नेतृत्व हे उद्धव ठाकरेंकडे असणार, असं अंधारे म्हणाल्या.
आमच्या पक्षनेतृत्वाने हा निर्णय घेतला असून पुर्णत: विचार करुन निर्णय घेतला आहे. सगळ्या शक्यता आणि बाजूंचा विचार करून निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्त्वाचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
मालक म्हणून वागण्यापेक्षा जेव्हा ते हस्तक म्हणून वागायला लागतात. तसेच त्यांचं वागणं भाजपच्या अंगाशी येतंय असं जेव्हा त्यांना वाटतं. त्यावेळेला राज्यपालांची गच्छंती तर करायची आहे. परंतु असं करताना आपल्या पक्षाला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही, याची काळजी घ्यायची, यासाठी हे चित्र तयार केलं जातं, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका केली.
हेही वाचा : युतीच्या घोषणा होताच नाशकात वंचित बहुजन आघाडीचा जल्लोष