मुंबई – केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी नुकतंच महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (Electronic Manufacturing Cluster) येणार असल्याची घोषणा केली. केंद्र सरकार महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक हब (Electronic Hub in Maharashtra) म्हणून घोषित करणार आहे. सर्वाधिक गुंतवणूक आणि सर्वाधिक रोजगार इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे. हा प्रकल्प म्हणजे राज्यासाठी केंद्र सरकारने दिलेलं गिफ्टच आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यासोबतच, नवीन वर्षांत महाराष्ट्राला केंद्र सरकार टेक्सटाईल पार्कदेखील (Textile Park) देणार आहे. राज्यात टेक्सटाईल क्लस्टर (Textile Cluster) तयार होणार आहे. याचं प्रपोजल अंतिम टप्प्यात सादर झालं आहे. बजेटपर्यंत याची घोषणा होऊ शकते, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा – केंद्र सरकारची मोठी घोषणा : 5 हजार रोजगार उपलब्ध करणारा प्रकल्प रांजणगावमध्ये
येत्या अर्थसंकल्पापर्यंत राज्यात नवा प्रकल्प येणार आहे. हे होत असताना एकीकडे महाराष्ट्रात आमचं सरकार येऊन तीनच महिने झाले तरीही फेक नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रातून उद्योग चाललेत. या फेक नरेटिव्हमध्ये काही राजकीय पक्ष, त्यांची इको सिस्टिम आणि दुर्दैवाने बोटावर मोजण्याइतके चार पाच एचएमवी पत्रकार. एचएमवी म्हणजे हिज मास्टर्ज व्हॉईस. असे मिळून या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातलाय, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केला.
एकतर अडीच वर्षांच्या महाविकास आघाडीच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार, गृहमंत्री जेलमध्ये, पोलीस आयुक्त जेलमध्ये, वसुली इतके भयानक कांड झाले की कोणीही महाराष्ट्रात यायला तयार नव्हतं. महाराष्ट्रात गुंतवणूक करायला तयार नव्हतं. महाराष्ट्राची ही जी विस्कटलेली घडी आहे ती घडी जागेवर आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असं ते म्हणाले.
मागच्याच कॅबिनेटमध्ये २५ हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे. पण त्याबाबत एकाही एचएमव्ही पत्रकारा ट्विट केलं नाही. आज पुन्हा एकदा २५ हजार कोटींचं प्रपोजल एका मिटिंगमध्ये मान्य झालं आहे, ही महाराष्ट्रात आलेली गुंतवणूक आहे, असं म्हणत त्यांनी काही पत्रकारांवरही निशाणा साधला.
गुंतवणुकीचा बाप म्हणजे महाराष्ट्रात येऊ घातलेली रिफायनरी. आजपर्यंत देशामध्ये कधीच गुंतवणूक झाली नाही इतकी सेफ गुंतवणूक रिफायनरीमध्ये आहे. यामुळे ३ लाख कोटीपेक्षा गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. तसंच, १ लाख लोकांना थेट रोजगार, इतर रोजगार मिळणार आहे. पण अशा रिफायनरीला विरोध केला जातोय. रिफायनरी होणारच, ती महाराष्ट्रासोबत केरळला होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. पण महाराष्ट्रातच पूर्ण रिफायनरी करण्याचा प्रयत्न सुरू. त्यांना महाराष्ट्राच्या गुंतवणुकीवर बोलण्याचा अधिकार काय? गुंतवणूक परत पाठवून महाराष्ट्राचं अतोनात नुकसान झालं. ही गुंतवणूक जात असताना कुठलेही एचएमव्ही बोलले नाही. साधं ट्विटदेखील केला नाही. महाराष्ट्राप्रती आताची जी संवदेना दिसते ती तेव्हा कुठे गहाण होते हे माहित नाही, असंही फडणवीस म्हणाले.